आयपीएल २०२१ चा थरार आता संपला आहे. आता क्रिकेट चाहत्यांना टी२० विश्वचषकाचे वेध लागले आहेत. १७ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या या स्पर्धेत १६ संघ विश्वचषक जिंकण्यासाठी आपला सर्वोत्तम प्रयत्न करताना दिसतील. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारताचा १५ सदस्यीय संघही दुसऱ्यांदा हे जेतेपद पटकावण्याच्या उद्देशाने मैदानात उतरेल.
यादरम्यान कर्णधार विराट कोहली म्हटले आहे की भारताच्या २००७ च्या टी -२० विश्वचषक मोहिमेनंतर त्याला विश्वास वाटू लागला होता की, तो लहान वयातही उच्च स्तरावर खेळू शकतो. भारतीय संघ त्यावेळी सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, सौरव गांगुली आणि अनिल कुंबळे सारख्या वरिष्ठ खेळाडूंशिवाय खेळत होता. भारतीय संघाने युवा एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली पहिला टी२० विश्वचषक जिंकला होता.
कोहलीने शनिवारी (१६ ऑक्टोबर) एका पत्रकार परिषदेत सांगितले की, ‘२००७ च्या विश्वचषकाचा माझ्या कारकिर्दीवर खूप मोठा परिणाम झाला. टी२० प्रकाराबद्दल कोणालाही खरोखर माहिती नव्हती. भारतीय संघाने विश्वचषक जिंकल्यानंतर आयपीएलचा उदय झाला यामुळे क्रिकेटमध्ये अद्भुत बदल देखील झाले.’
ज्यावेळी भारताने टी२० विश्वचषक जिंकला, त्यावेळी संघाचे सरासरी वय २३ वर्षे होते. धोनी स्वतः स्पर्धेच्या दोन महिने आधी २६ वर्षांचा झाला होता. कोहली म्हणाला की, ‘टी२० विश्वचषक स्पर्धेतील संघाच्या यशाचा परिणाम नंतरच्या वर्षांमध्ये अधिक जाणवला, पण एक तरुण म्हणून त्यावेळी मला या भारतीय संघाने विश्वास दिला की मी उच्च स्तरावर जाऊन खेळ खेळू शकतो.’
कोहली म्हणाला, ‘एका तरुण कर्णधाराने अगदी वयाने लहान असलेल्या संघाचे नेतृत्व करणे ही एक उल्लेखनीय कामगिरी होती. तो विश्वचषक आम्हाला आजही आठवतो, या युवा भारतीय संघाला जागतिक स्तरावरील गोष्टी साध्य करताना पाहणे आणि प्रत्येकाला वाटले होते की हे फक्त साधारण टी२० क्रिकेट आहे, परंतु काही वर्षांनंतर त्या विजयाचा परिणाम आम्हाला समजला.’
विराट पुढे म्हणाला, ‘त्यावेळी या तरुण संघाने जे केले ते खूपच खास होते, ते खूप प्रेरणादायी होते. त्यावेळी बरेच खेळाडू मैदानात येऊन चांगली कामगिरी करत होते. त्यामुळे माझ्यासारख्या तरूणाला प्रेरणा आणि आत्मविश्वास मिळाला की, मी देखील कमी वयात चांगली कामगिरी करू शकतो, तेही मोठ्या स्तरावर.’
विराट या टी२० विश्वचषक स्पर्धेत भारताला दुसरे जेतेपद मिळवून देण्याचा प्रयत्न करेल. १७ नोव्हेंबरपासून टी२० विश्वचषक सुरू होत आहे. भारत २४ ऑक्टोबर रोजी स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा सामना करेल.
महत्त्वाच्या बातम्या –
विराटला भेटण्यापूर्वी अनुष्का क्वारंटाईन; समोर असूनही एकमेकांना भेटणे झाले कठीण, पाहा फोटो
भारत-पाकिस्तान सामन्याच्या तिकिटांसाठी मित्रांची विराटकडे मागणी; कर्णधाराकडून आलं ‘असं’ उत्तर
गंभीर म्हणतो, आयपीएल २०२२मध्ये सीएसकेच्या ‘या’ ३ शिलेदारांना रिटेन करेल; पण धोनी…