आता यात कोणतीही नवी गोष्ट राहिली नाही कि भारतीय कर्णधार विराट कोहली आणि प्रशिक्षक अनिल कुंबळे यांच्यात जोरदार शीतयुद्ध सुरु आहे. परंतु बेंगलोर मिररमधील वृत्तप्रमाणे बांगलादेश- भारत सराव सामन्यापूर्वी या दोघातील वादाने एक नवीन वळण घेतले. जेव्हा भारतीय कर्णधार नेटमध्ये सराव करत होता तेव्हा तिथे कुंबळे आलेला पाहून विराटने मैदान सोडले.
भारतीय पाठीराख्यांना संघाने पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यापूर्वी एकाग्र राहून सराव केला पाहिजे असं वाटत असतानाच या दोघांमधील वादाने आता भलतंच वळण घेतलं आहे. जेव्हा विराट कोहली नेटमध्ये सराव करत होता तेव्हा भारतीय प्रशिक्षक अनिल कुंबळे तिथे काही सरावाचं साहित्य घेऊन गेला. कुंबळे तिथे पोहोचल्याबरोबर विराटने लगेच सराव बंद करून तिथून निघून जाणे पसंद केले.
काही वृत्तपत्रातील रिपोर्टनुसार तर कुंबळेला पाहून विराटनं हातातली बॅट टाकली आणि त्यानं मैदान सोडलं. यावेळी या दोघांमध्ये शाब्दिक वाद झाला नाही. मात्र दोघांची देहबोली हे स्पष्ट करत होती की या दोघांमध्ये आता मैत्रीपूर्ण संबंध संपुष्टात आले आहेत.
बीसीसीआयने सध्या कुंबळेला मुदतवाढ न देण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु कुंबळेने पुन्हा या पदासाठी अर्ज केला असून त्याबरोबर वीरेंद्र सेहवाग, टॉम मूडी या दिग्गजांचे अर्ज देखील आले आहेत.
भारताचा चॅम्पियन्स ट्रॉफीमधील पहिला सामना ४ जून रोजी पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानबरोबर होत आहे.