सुमारे 7 महिन्यांनंतर भारतीय संघाच्या जर्सीत परतलेला विराट कोहलीचा पुनरागमन सामना मात्र खास ठरला नाही. पर्थच्या मैदानावर 8 चेंडू खेळल्यानंतर ‘किंग कोहली’ शून्यावर बाद झाला. मात्र, सामन्यापूर्वी विराटने आपल्या आयुष्याबद्दल, ब्रेकबद्दल आणि करिअरबद्दल मनमोकळेपणाने संवाद साधला. त्याने सांगितले की ब्रेकनंतर तो आता खूप ताजातवाना आणि उत्साही वाटत आहे.
कोहली म्हणाला की तो गेल्या 15 वर्षांपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट आणि आयपीएल खेळत आहे. त्यामुळे त्याला स्वतःसाठी काही करण्याची फारशी संधी मिळत नव्हती. या ब्रेकमुळे त्याला आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवण्याची चांगली संधी मिळाली. या मालिकेपूर्वी विराट चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये खेळताना दिसला होता. त्या स्पर्धेत कोहली भारताकडून दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला होता.






