इंग्लंडविरुद्ध काल पार पडलेल्या पाचव्या टी२० सामन्यात भारतीय संघाने सफाईदार विजय मिळविला. प्रथम फलंदाजी करतांना भारताने २० षटकांत केवळ २ गडी गमावून तब्बल २२४ धावा उभारल्या. या विशाल लक्ष्याचा पाठलाग करतांना इंग्लंडचा संघ १८८ धावाच करू शकल्याने भारताने या सामन्यात ३६ धावांनी विजय मिळविला. यासह पाच सामन्यांची टी२० मालिका देखील ३-२ अशा फरकाने खिशात घातली.
या सामन्यात भारताचा अनुभवी सलामीवीर रोहित शर्माने अप्रतिम अर्धशतकी खेळी करत भारताच्या विजयाची पायाभरणी केली. त्याने कर्णधार विराट कोहलीसह ९४ धावांची सलामी देत मोठ्या धावसंख्येचा पाया रचला. त्याच्या या खेळीतील फटक्यांची चर्चा सामन्यानंतर देखील सुरूच होती.
इंग्लिश गोलंदाजांवर चौफेर हल्ला
शैलीदार फलंदाजीसाठी प्रसिद्ध असलेल्या रोहित शर्माने कालच्या डावाची थोडी सावध सुरुवात केली. डावाच्या सुरूवातीची तीन षटके त्याने गोलंदाजांचा आणि परिस्थितीचा अंदाज घेणे, पसंत केले. त्यानंतर मात्र त्याने इंग्लिश गोलंदाजांवर चौफेर हल्ला चढवला. मैदानाच्या प्रत्येक भागात फटके मारत त्याने इंग्लिश गोलंदाजांना निरूत्तर केले.
रोहितने या डावात ३४ चेंडूत ६४ धावांची खेळी करतांना ४ चौकार आणि ५ षटकार लगावले. या खेळी दरम्यान रोहितचा प्रत्येक फटका डोळ्यांचे पारणे फेडणारा होता. नजाकत आणि टायमिंगचा सुरेख संगम त्याच्या या खेळीत दिसून आला. त्याच्या खेळीतील सगळ्या षटकारांचा व्हिडिओ एका चाहत्याने ट्विटरवर पोस्ट केला आहे.
https://twitter.com/imcharanRo45/status/1373294700510154759
फलंदाजांच्या पायावर गोलंदाजांचा कळस
रोहित व्यतिरिक्त भारताच्या डावात कर्णधार विराट कोहलीने देखील नाबाद ८० धावांची खेळी केली. तसेच सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पंड्या यांनी देखील अनुक्रमे ३२ आणि ३९ धावा करत भारताची धावसंख्या सव्वा दोनशे पर्यंत नेण्यात हातभार लावला.
फलंदाजांनी केलेल्या या पायाभरणीवर गोलंदाजांनी अचूक मारा करत कळस चढवला. जोस बटलर आणि डेव्हिड मलान यांच्या व्यतिरिक्त एकाही इंग्लिश फलंदाजाला त्यांनी खेळपट्टीवर फार काळ टिकू दिले नाही. त्यामुळे निर्धारित २० षटकांत इंग्लंडला ८ बाद १८८ धावांवर समाधान मानावे लागले. पण भारताने मात्र सामन्यासह मालिका विजयाच्या यशाचाही टिळा कपाळी लावला.
महत्वाच्या बातम्या:
टी२० मालिका गमावल्यानंतर मॉर्गनने केले मन जिंकणारे वक्तव्य, म्हणाला
जोस बटलरशी घातलेला वाद कोहलीला महागात पडणार? होऊ शकते ही कारवाई
रोहित-विराट वादाच्या चर्चेला पूर्णविराम! पाचव्या सामन्यात दिसले जबरदस्त बॉन्डिंग