आयपीएल २०२० हंगामातील १४ वा सामना चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद संघात पार पडला. हा सामना चेन्नईने ७ धावांनी गमावला. या हंगामातील चेन्नईचा हा सलग तिसरा पराभव आहे. हा सामना गमावण्यामागे चेन्नईचे खराब क्षेत्ररक्षण कारणीभूत असल्याचे तसेच खेळाडू सातत्याने एकच चुका करत असल्याचे सामन्यानंतर कर्णधार एमएस धोनीने मान्य केले.
या सामन्यात चेन्नईकडून खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले. चेन्नईने सुरुवातीला हैदराबादचे ४ फलंदाज ६९ धावांतच बाद करत सामन्यावर पकड मिळवली होती. मात्र त्यानंतर प्रियम गर्ग आणि अभिषेक शर्मा यांनी ७७ धावांची भक्कम भागीदारी केली आणि हैदराबादला सावरले. त्यांच्या याच भागीदारीदरम्यान अभिषेकला त्याचा झेल सुटल्याने २ वेळा जीवदान मिळाले.
हैदराबादने गर्ग आणि अभिषेकच्या भागीदारीच्या जोरावर प्रथम फलंदाजी करताना १६४ धावा करत चेन्नईला १६५ धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईच्या फलंदाजांची चांगलीच दमछाक झाली. चेन्नईला निर्धारित २० षटकात ५ बाद १५७ धावाच करता आल्या.
चेन्नईकडून रविंद्र जडेजाने सर्वाधिक ५० धावांची खेळी केली. तर धोनीने नाबाद ४७ धावा केल्या. तसेच फाफ डु प्लेसिसने २२ धावा केल्या. या व्यतिरिक्त चेन्नईकडून कोणत्याही फलंदाजाला २० धावांचा टप्पा हैदराबादच्या गोलंदाजांनी ओलांडू दिला नाही.
सामन्यानंतर धोनी म्हणाला, ‘मी अनेक चेंडूवर चांगले फटके मारु शकलो नाही. मी खूप प्रयत्न करत होतो. मला कोणताही त्रास नाही पण सध्याच्या उष्णतेत सातत्याने गळ्याला कोरड पडते.’
तसेच धोनी चेन्नईच्या क्षेत्ररक्षणाबद्दल म्हणाला, ‘आम्ही कदाचीत सलग तीन सामने कधीही पराभूत झालो नव्हतो. आम्हाला चूका सुधाराव्या लागतील. आम्ही सातत्याने एकसारख्या चूका करु शकत नाही. आज झेल सुटले, नोबॉल पडले. आम्ही चांगले खेळू शकत होतो.’
‘कोणालाही झेल सोडायचे नसतात, पण आत्ता आम्हाला या स्तरावर असे झेल घ्यावे लागतील. विशेषत: जेव्हा संघाची खूप चांगली कामगिरी होत नाही. तूम्ही तूमचे सर्वोत्तम देणे महत्त्वाचे असते. या सामन्यातून बऱ्याच सकारात्मक गोष्टी घेण्यासारख्या होत्या, पण आम्ही चांगले पुनरागमन करण्याचा प्रयत्न करु.
चेन्नईचा पुढील सामना ४ ऑक्टोबरला किंग्स इलेव्हन पंजाबविरुद्ध होणार आहे.