वैभव सूर्यवंशीच्या फलंदाजीची कमाल पाहण्यासाठी आता आयपीएलची प्रतिक्षा करण्याची गरज नाही. त्याआधीच चाहत्यांना त्याची स्फोटक फलंदाजी दिसणार आहे. ज्या स्पर्धेत भारताचा स्टार अष्टपैलू हार्दिक पांड्याने २० षटकार मारले होतो, तेथे आता वैभवचे वादळ येणार आहे.
मुंबईमध्ये २३ फेब्रुवारीपासून डीवाय पाटील टी२० टुर्नामेंट सुरू होणार आहे. या स्पर्धेत वैभव खेळणार असल्याचे समोर येत आहे. या स्पर्धेत १६ संघ खेळणार असून ती आयपीएल २०२६ आधीच खेळली जाणार आहे. यामध्ये काही आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडूही खेळतील.
या स्पर्धेत हार्दिकने उल्लेखनीय कामगिरी करत भारतीय संघात पुनरागमन केले होते. २०२०मध्ये त्याला दुखापत झाली असता संघात परतण्याआधी त्याने या स्पर्धेतच चांगली कामगिरी केली होती. त्याने केवळ दोन दिवसांच्या अंतराने दोन शतकी खेळी केल्या होत्या. ज्यामधील एका सामन्यात तर षटकारांचा पाऊस पाडला होता. यामुळे ज्यांना दुखापतीनंतर संघपुनरागमन करायचे आहे, त्यांच्यासाठी सराव म्हणून ही स्पर्धा उत्तमच.
हार्दिक डीवाय पाटील टी२० स्पर्धेत रिलायंसकडून खेळला. त्याने ६ मार्च २०२०मध्ये बीपीसीएलच्या विरुद्ध खेळताना उपांत्य सामन्यात ५५ चेंडूत १५८ धावा केल्या होत्या. ज्यामध्ये २० षटकार आणि ६ चौकारांचा समावेश आहे. त्याआधी त्याने ४ मार्चलाही शतक केले होते. त्याने १० षटकारांसह ३७ चेंडूत १०० धावा केल्या होत्या.
आता या स्पर्धेत वैभवच्या कामगिरीवर लक्ष असणार आहे. नुकतेच त्याने १९ वर्षाखालील विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात दीड शतकी खेळी केली होती. इंग्लंडविरुद्धच्या त्या सामन्यात वैभवने ८० चेंडूत १७५ धावा केल्या होत्या. यावर्षी त्याने १९ वर्षाखालील क्रिकेटमध्ये २ शतकी खेळी केल्या आहेत.
सध्या वैभव राजस्थान रॉयल्सच्या शिबिराचा भाग आहे, जे २१ फेब्रुवारीला संपणार आहे. यामुळे त्यानंतरच तो डीवाय पाटील टी२० स्पर्धेत खेळेल. ही स्पर्धा सर्वात जुनी असून त्याची सुरूवात २००३मध्ये झाली आहे. या स्पर्धेचे सामने डीवाय पाटील स्टेडियमवर खेळले जातात.






