आयपीएल स्पर्धेतील 33 वा सामना आज म्हणजेच 17 एप्रिल रोजी वानखेडे क्रिकेट स्टेडियमवर मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद संघात खेळला जाणार आहे. हा सामना दोन्ही संघांसाठी खूप महत्त्वपूर्ण असणार आहे. कारण दोन्ही संघ पॉईंट्स टेबलवर खालच्या स्थानी आहेत. सलग चार सामने पराभूत होऊन आता पॅट कमिन्सच्या हैदराबादने पुनरागमन केले आहे. तसेच आज मुंबई त्यांच्या घरेलू मैदानावर सामना खेळणार आहे, त्यामुळे हे कितपत त्यांच्यासाठी फायद्याचं असेल? याचबरोबर जाणून घ्या की या मैदानावर आयपीएल रेकॉर्ड कसे राहिलेले आहे आणि आज खेळपट्टी कोणाच्या बाजूने असेल.
आयपीएलमध्ये या दोन्ही संघांबद्दल बोलायचे झाल्यास, मुंबई इंडियन्सने 6 सामन्यांमधील 2 सामने जिंकले आहेत. तसेच 4 सामने गमावले आहेत. मुंबई पॉईंट्स टेबलवर 4 गुणांनी सातव्या क्रमांकावर आहे .तसेच सनरायझर्स हैदराबादने हंगामातील पहिला सामना जिंकला होता. त्यानंतर सलग 4 सामने गमावल्यानंतर मागचा सामना जिंकून ते पॉइंट्स टेबलमध्ये 10 व्या क्रमांकावरून 9 व्या स्थानावर पोहोचले आहेत. जर आज हैदराबाद संघ विजयी ठरला तर तो सातव्या क्रमांकावर पोहोचेल.
वानखेडे स्टेडियम पहिल्या हंगामापासून मुंबई इंडियन्स संघाचं घरेलू मैदान आहे. या मैदानावर आत्तापर्यंत 118 आयपीएल सामने खेळले गेले आहेत. यामध्ये प्रथम फलंदाजी करणारा संघ 55 वेळा तसेच नंतर धावांचा पाठलाग करणारा संघ 63 वेळा विजयी झाला आहे. याचबरोबर टॉस जिंकणारा संघ 61 आणि टॉस हरणारा संघ 57 वेळा विजयी झाला आहे. यावरून मानलं जातं की, या मैदानावर धावांचा पाठलाग करणे चांगले राहील. यामुळे प्रथम टॉस जिंकून गोलंदाजी करणे उत्तम आहे.
वानखेडे स्टेडियमवर सर्वात मोठी धावसंख्या 235 आहे, जी आरसीबीने मुंबई इंडियन्सविरुद्ध 2015 मध्ये केली होती. या सामन्यात एबी डिव्हिलियर्सने 133 धावा केल्या होत्या, जी धावसंख्या व्यक्तिगत या मैदानावरील आयपीएलमधील सर्वात मोठी धावसंख्या आहे. तसेच या मैदानावर सर्वात चांगली गोलंदाजी हरभजन सिंग आणि हसरंगा दोघांनी केली आहे, यांनी 18-18 धावा देत 5-5 विकेट्स घेतल्या होत्या.
आजच्या सामन्यात मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर फिरकीपटूंना जास्त मदत होण्याची शक्यता आहे. तसेच हे स्टेडियम फलंदाजीसाठी मानले जाते आणि आज एक मोठी धावसंख्या होण्याची शक्यता आहे, यामुळे टॉस महत्वपूर्ण राहील. जो कर्णधार टॉस जिंकेल त्याने प्रथम गोलंदाजी घेणे योग्य ठरेल.