दक्षिण आफ्रिकेत सुरू असलेल्या महिला टी20 विश्वचषकात शनिवारी (18 फेब्रुवारी) भारत विरुद्ध इंग्लंड सामना खेळला गेला. ब गटातून अव्वल स्थानी कोण राहणार यासाठी असलेल्या या सामन्यात इंग्लंडने सर्वोत्तम खेळ दाखवला. फलंदाजांनी 152 धावांचे आव्हान ठेवल्यानंतर गोलंदाजांनी अप्रतिम कामगिरी करून भारताला 140 धावांपर्यंत मर्यादित ठेवले. या 11 धावांच्या विजयासह इंग्लंडने स्पर्धेच्या उपांत्य फेरीत जागा बनवली.
England recovered from 29-3 to register an 11-run against India to qualify for the semis of the T20 World Cup. #INDvAUS pic.twitter.com/GT65Rs78Qr
— Wisden India (@WisdenIndia) February 18, 2023
आत्तापर्यंत स्पर्धेत अजिंक्य असलेल्या या दोन्ही संघांदरम्यान हा सामना अव्वल स्थानासाठी रंगणार होता. भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौरने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रमुख वेगवान गोलंदाज रेणुका सिंग हिने हा निर्णय योग्य ठरवला. तिने इंग्लंडच्या पहिल्या तीन फलंदाजांना पाच षटकात तंबूत पाठवले. मात्र, त्यानंतर कर्णधार हिदर नाईट व नॅट सिव्हरने संघाचा डाव सावरला. दोघींनी चौथ्या गड्यासाठी अर्धशतकी भागीदारी केली. नाईट 28 धावांवर परतल्यानंतर सिव्हरने एमी जोन्ससह 40 धावा केल्या. सिव्हर अर्धशतक करून बाद झाल्यानंतर जोन्सने अखेरच्या षटकात बाद होण्यापूर्वी 40 धावा केल्या. यासह इंग्लंडने आपल्या निर्धारित 20 षटकात 151 धावा उभारल्या. भारतासाठी रेणुका शिंगणे सर्वाधिक पाच बळी मिळवले.
या धावांचा पाठलाग करताना भारताची सुरुवात चांगली झाली. शफाली वर्मा व स्मृती मंधाना यांनी 4 षटकात 29 धावा केल्या. मात्र, अनुभवी जेमिमा रॉड्रिग्ज व कर्णधार हरमनप्रीत कौर अपयशी ठरल्याने भारतीय संघावर दबाव वाढला. स्मृती मंधानाने शानदार अर्धशतक पूर्ण केले. मात्र, पुढच्याच चेंडूवर ती बाद झाली. अखेरीस रिचा घोषने 34 चेंडूवर नाबाद 47 धावा करत भारतासाठी अपयशी झुंज दिली.
या विजयानंतर इंग्लंडने उपांत्य फेरीत आपली जागा पक्की केली. तर, भारतीय संघाला आता आपल्या अखेरच्या साखळी सामन्यात विजय मिळवावा लागेल. 20 फेब्रुवारी रोजी आयर्लंडविरुद्ध भारताचा अखेरचा सामना होणार आहे.
(Womens T20 World Cup England Beat India Renuka Richa Smriti Fight For Team India)