बॉर्डर गावस्कर ट्रॉफी 2024-25 चा तिसरा सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ‘गाबा’ येथे खेळला जात आहे. सामना सुरू होण्यापूर्वी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला होता. आता नेमकं तेच घडताना दिसत आहे.
पावसामुळे पहिल्या दिवसाचा खेळ अवघ्या 13.2 षटकांनंतर थांबवण्यात आला. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये पोहोचण्यासाठी टीम इंडियाला या मालिकेतील सर्व सामने जिंकणे खूप महत्त्वाचं आहे. अशा स्थितीत ‘गाबा’ वरील पाऊस भारताच्या अडचणी वाढवणारा आहे. जर गाबा कसोटी अनिर्णित राहिली तर त्याच्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यावर काय परिणाम होईल? हे आम्ही तुम्हाला या बातमीद्वारे सांगतो.
गाबा कसोटी अनिर्णित राहिल्यास ऑस्ट्रेलिया आणि भारतीय संघाला प्रत्येकी चार गुणांवर समाधान मानावे लागेल. यानंतर भारताचे 55.88 गुण आणि ऑस्ट्रेलियाचे 58.88 गुण होतील. अशा प्रकारे दोन्ही संघ पूर्वीप्रमाणेच आपापल्या स्थानावर कायम राहतील. सध्या टीम इंडिया 57.29 टक्के गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे, तर ऑस्ट्रेलिया 60.71 टक्के गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे.
गाबा कसोटी अनिर्णित राहिल्यानंतर जर टीम इंडिया उर्वरित दोन सामने जिंकण्यात यशस्वी ठरली, संघ थेट फायनलमध्ये प्रवेश करेल. परंतु उरलेल्या दोन सामन्यांपैकी जर भारतानं एक जिंकला, एक हरला आणि मालिका 2-2 अशी बरोबरीत राहिली, तर ‘मेन इन ब्लू’ला ऑस्ट्रेलिया विरुद्ध श्रीलंका सामन्याच्या निकालावर अवलंबून राहावं लागेल. श्रीलंकेच्या संघानं ती मालिका 1-0 किंवा 2-0 ने जिंकावी, अशी प्रार्थना भारतीय चाहते करतील.
जागतिक कसोटी चॅम्पियनशीपच्या गुणतालिकेत सध्या दक्षिण आफ्रिका अव्वल स्थानी असून, त्याचं फायनलमध्ये पोहचणं जवळपास पक्कं आहे. उर्वरित एका जागेसाठी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात चुरशीची लढत आहे.
हेही वाचा –
IND vs AUS: शेवटच्या चार दिवसांच्या खेळाच्या वेळेत बदल, गाबा कसोटीबाबत मोठे अपडेट समोर
शोएब अख्तर बरळला, जसप्रीत बुमराहला दिला कसोटी क्रिकेट सोडण्याचा सल्ला
IND VS AUS; ब्रिस्बेन कसोटीचा पहिला दिवस रद्द, पावसामुळे फक्त 13.2 षटकांचा खेळ