भारतीय क्रिकेटमधील सर्वात महत्त्वाची स्पर्धा असलेल्या रणजी ट्रॉफीचा नवीन हंगाम सध्या भारतातील विविध शहरांमध्ये खेळला जात आहे. १७ नोव्हेंबरपासून सुरू झालेल्या स्पर्धेत अनेक युवा खेळाडू आपला दम दाखवताना दिसत आहेत. आयपीएलमध्ये निवडल्या गेलेल्या अब्दुल समद, शाहरुख खान व सर्फराज खान या नवोदित खेळाडूंनी चमकदार खेळ करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्याचबरोबर नुकताच वेस्ट इंडीज येथे झालेल्या एकोणीस वर्षाखालील मुलांच्या विश्वचषकात विजेतेपद पटकावणाऱ्या भारतीय संघाचे नेतृत्व केलेल्या दिल्लीच्या यश धूलने (Yash Dhull) रणजी पदार्पणात एक खास कामगिरी नोंदवली.
नव्या रणजी हंगामाच्या पहिल्याच सामन्यत यश धूलने आपले रणजी पदार्पण केले. अनुभवी तमिळनाडू संघासमोर त्याने पहिल्या दिवशी शतक करत सर्वांची मने जिंकली होती. त्याने पहिल्या डावात ११३ धावांची खेळी केली होती. त्यानंतर दुसऱ्या डावात देखील त्याने हीच कामगिरी कायम ठेवली. दुसऱ्या डावात पुन्हा एकदा त्याने ११३ धावांची नाबाद खेळी केली. हा चारदिवसीय सामना अखेरीस अनिर्णीत राहिला.
अशी कामगिरी करणारा केवळ तिसरा फलंदाज
रणजी पदार्पणाच्या दोन्ही डावात शतक करणारा यश केवळ तिसरा फलंदाज आहे. त्याच्या पूर्वी दिग्गज भारतीय फलंदाज नरी कॉन्ट्रॅक्टर यांनी १९५२-१९५३ चा हंगामा गुजरातसाठी व महाराष्ट्राचा माजी रणजीपटू विराग आवटे याने २०१२-२०१३ मध्ये ही कामगिरी करून दाखवली होती.
सामना राहिला अनिर्णित
गुवाहाटी येथे झालेल्या या सामन्यात दिल्ली संघाने प्रथम फलंदाजी करताना यश धूल व ललित यादव यांच्या शतकांच्या जोरावर ४५२ धावा बनविलेल्या. त्यानंतर तमिळनाडू संघाने बाबा इंद्रजीत व शारूख खान यांच्या शतकांच्या मदतीने ४९४ धावा करत आघाडी घेतली. त्यानंतर दिल्लीने आपल्या दुसऱ्या डावात यश धूल आणि ध्रुव शोरे यांच्या नाबाद शतकांच्या २२८ धावा करत सामना अनिर्णित राखला.
महत्वाच्या बातम्या-