साल २००९ हे वर्ष क्रिकेटसाठी नेहमीच एका भयानक घटनेची आठवण करुन देणारे ठरले आहे. या वर्षी ३ मार्चला पाकिस्तान दौऱ्यावर गेलेल्या श्रीलंका संघाच्या बसवर दहशदवादी हल्ला झाला होता. ज्यानंतर लगेचच पाकिस्तानमधील आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने बंद करण्यात आले होते. त्यावेळी ती घटना घडली कशी?
झाले असे की जानेवारी-फेब्रुवारी २००९ मध्ये भारतीय संघ पाकिस्तान दौरा करणार होता. त्यावेळी भारत आणि पाकिस्तान संघात ३ कसोटी, ५ वनडे आणि १ टी२० सामना होणार होता. तेव्हा भारतीय संघाचे नेतृत्व एमएस धोनीकडे होते. तर राहुल द्रविड, सचिन तेंडुलकर, लक्ष्मण, झहिर खान असे खेळाडू भारतीय संघाचे नियमित सदस्य होते. पण या दौऱ्याच्या २ महिन्यांआधी ११ नोव्हेंबर २००८ ला मुंबईत दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्याचा परिणाम असा झाला की बीसीसीआयने तसेच भारताचे तत्कालीन क्रीडामंत्री एमएस गिल यांनी भारतीय संघाचा हा दौरा त्वरित रद्द केला. हा दौरा रद्द होण्याआधीही सुरक्षेचा प्रश्न होताच. त्यासाठी बीसीसीआय सरकारच्या परवानगीचीही वाट पाहत होते. त्याआधीच ज्यूनियर भारतीय हॉकी संघाला सुरक्षेच्या कारणाने पाकिस्तान दौऱ्यासाठी जाण्याची परवानगी भारतीय सरकारने नाकारली होती. परंतू त्यानंतर लगेचच मुंबईत हल्ला झाल्याने हा दौरा रद्दच करण्यावर शिक्कामोर्तब झाले.
त्यामुळे आता या दौऱ्याची भरपाई करणार कशी असा पाकिस्तानसमोर प्रश्न होता. कारण त्याआधीही ऑस्ट्रेलियन संघाने सुरक्षेचे कारण देत पाकिस्तानला येण्यास नकार दिला होता. अखेर श्रीलंका क्रिकेट बोर्ड पाकिस्तान दौऱ्यासाठी तयार झाले. त्यावेळी श्रीलंका क्रिकेट बोर्डाने ते पाकिस्तानच्या सुरक्षा व्यवस्थेबाबत संतुष्ट असल्याचे म्हटले होते. त्यानंतर २० जानेवारीपासून पाकिस्तान आणि श्रीलंका संघात वनडे मालिकेला सुरुवात झाली. ३ सामन्यांची वनडे मालिका २-१ ने श्रीलंका संघाने जिंकली.
त्यानंतर फेब्रुवारीमध्ये पहिला कसोटी सामना कराचीला झाला. या सामन्यात पाकिस्तान संघाचा कर्णधार युनुस खान आणि श्रीलंकेचा कर्णधार माहेला जयवर्धने तसेच थिलन समरवीराने द्विशतके ठोकली होती. हा सामना अनिर्णित राहिला होता. या सामन्यानंतर पुढील सामना लाहोरला गद्दाफी स्टेडियममध्ये होणार होता. त्यासाठी दोन्ही संघ लाहोरला पोहचले. हा सामना १ मार्चपासून सुरु झाला. श्रीलंकेने पहिल्याच डावात समरवीराच्या द्विशतकी आणि कुमार संगकारा व तिलकरत्ने दिल्शानच्या शतकी खेळीच्या जोरावर ६०६ धावांचा डोंगर उभा केला होता. त्यानंतर फलंदाजीला उतरलेला पाकिस्तान संघ १ बाद ११० धावांवर असताना दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला. त्यावेळी कोणीही विचारही केला नसेल की तिसऱ्या दिवशीचा खेळ होणारच नाही.
त्या दौऱ्यादरम्यान पाकिस्तान आणि श्रीलंका संघ बरोबरच मैदानावर जात होता. पण त्या सामन्याच्या तिसऱ्या दिवशी पाकिस्तान संघ ५ मिनिटे उशीरा निघाला होता. त्यावेळी श्रीलंकेच्या संघाच्या बसमध्ये श्रीलंकेचे खेळाडू तसेच प्रशिक्षक ट्रेवर बायलिस आणि सहाय्यक प्रशिक्षक पॉल फर्ब्रेस, अन्य सपोर्ट स्टाफ होते. त्याचबरोबर त्यांच्या मागे एक मिनीव्हॅन होती ज्यात आयसीसीचे सामनाधिकारी होते. यात पंच सायमन टॉफेल, एहसान रजा, पीटर मॅन्यूअल्स हे होते. तर सामनाधिकारी ख्रिस ब्रॉडही होते. या दोन्ही गाड्यांसह २ पोलिसांच्या गाड्या त्यांच्यासह होत्या.
परंतू पाकिस्तानच्या वेळेनुसार सकाळी पावणेनऊच्या सुमारास स्टेडियम केवळ हाकेच्या अंतरावर असतानाच श्रीलंका संघाच्या बसवर १२ अतिरेक्यांनी हल्ला करण्यास सुरुवात केली. लाहोरच्या लिबर्टी चौकात असताना हा हल्ला झाला होता. त्यावेळी वेळेचे भान राखत मेहेर मोहम्मद खलील या श्रीलंका संघाच्या बस ड्राईव्हरने पुढील संकट ओळखत बस वेगात नेण्याचा प्रयत्न केला. यावेळी तो स्वत:च्या जीवाची काळजी घेता घेता श्रीलंकेच्या संघाचीही काळजी घेत होता. अतिरेक्यांनी हँड ग्रेनेड बसखाली टाकले होते, परंतू ते फुटण्याआधीच खलील बस पुढे घऊन जाण्यात यशस्वी ठरला.
फर्ब्रेस यांनी बीसीसीला दिलेल्या मुलाखतीनुसार बुलेट्स जेव्हा बसवर आदळत होत्या तेव्हा आत सर्वजण बसमध्ये खाली लोटले होते. त्यावेळी फक्त दिलशानचा आवाज येत होता. तो ड्रायव्हरच्या मागे बसला होता आणि स्टीयरिंगवर हात ठेवून डोके खाली घातलेल्या ड्राईव्हरला हळूहळू डोके वर करत मार्ग सांगत होता. त्यानुसार त्या दोघांनी मिळून बस पुढे आणली होती आणि ड्राईव्हरने स्टेडियमपर्यंत बस आणल्यानंतरच बस थांबवली. ड्राईव्हर आणि दिलशानने दाखवलेल्या या धैर्यामुळे श्रीलंका संघ मोठ्या संकटातून बाहेर पडले होते. मात्र या घटनेमध्ये श्रीलंकेचे काही खेळाडू जखमी झाले. संगकाराला खांद्याला जखम झालेली, अजंता मेंडिसच्या मानेला दुखापत झालेली, चामिंडा वास देखील दुखापतग्रस्त झाला होता. तसेच फर्ब्रेस यांच्या देखील हाताला गोळी घासून गेली होती. पण सर्वात गंभीर जखमी समरवीरा आणि थरंगा परमवितरना झाले होते. समरवीराच्या पायाला तर परमवितरनाच्या छातीला गोळी घासून गेली होती.
एवढेच नाही तर श्रीलंका संघाच्या बसच्या मागे असणाऱ्या आयसीसी आधिकाऱ्यांच्या व्हॅनवरही हल्ला झाला होता. त्यांचा ड्राईव्हर या हल्ल्यात मारला गेला होता. एका पोलिस अधिकाऱ्याने त्यांची व्हॅन स्टेडियमपर्यंत आणली होती. पण यादरम्यान पंच अहसान रझा यांच्या पोटात गोळी लागली होती. या दरम्यान ६ पोलिस आणि २ नागरिकांना आपला जीव गमवावा लागला होता.
त्यावेळी त्या व्हॅनमध्ये असलेल्या सायमन टॉफेल यांनी त्यांच्या ‘फाइंडिग द गॅप्स’ पुस्तकाच्या प्रकाशनावेळी या प्रसंगाबद्दल सांगितले होते. ‘दहशतवाद्यांनी हल्ला केलेल्या व्हॅनमध्ये मी आणि सामन्याचे चौथे पंच अहसान रझादेखील उपस्थित होते. मी बसमध्ये एकाच सीटवर बसायचो, त्या सामन्यात मी माझी सीट बदलण्याचा निर्णय घेतला. अहसान रझा त्यांच्या जागी मी बसला होतो आणि रझा माझ्या सीटवर त्यावेळी बसले होते. त्यादरम्यान बर्याच गोष्टी घडल्या. आम्ही ज्या व्हॅनमध्ये प्रवास करत होतो त्यावर हल्ला झाला. दहशतवाद्यांनी आमच्या ड्राइव्हरला ठार मारले. यानंतर रझाच्या खांद्यावर गोळी लागली आणि दुसरी गोळी रझाच्या पोटात लागली. यानंतर भीतीचे वातावरण होते आणि मी पीटर मॅन्यूअल्सचा हात धरून बसलो.’
या हल्ल्याची बातमी काहीवेळातच सर्वत्र पसरली. त्यावेळी सर्वांना लगेचच स्टेडियममधील ड्रेसिंगरुममध्ये आणण्यात आले. त्यावेळी खेळाडूंसह सर्वजण ५ तास ड्रेसिंग रुममध्ये होते. यादरम्यान गंभीर इजा झाल्याने समरवीरा आणि परमवितरनाला लगेचच हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. यानंतर स्टेडियममध्ये पहिल्यांदाच चॉपर उतरवण्यात आले. त्यातून दोन्ही संघांना हॉटेलमध्ये सुरक्षित आणण्यात आले. त्याचदिवशी रात्री श्रीलंकेचा संघ कोलंबोला परत गेला. तिथे सर्वांवर उपचार करण्यात आले. काही दिवसांनंतर ड्राईव्हर खलीलचाही त्याने दाखवलेल्य धैर्याबद्दल सत्कार झाला. काही दिवस तो हल्ला पाहिलेल्या सर्वांसाठीच कठीण गेले होते. त्या घटनेनंतर पाकिस्तानमधील क्रिकेटही पूर्णपणे काही वर्षे बंद झाले. पुढील सर्वच आंतरराष्ट्रीय सामने पाकिस्तानमधून हलवण्यात आले. यात २०११ च्या विश्वचषकाचा समावेशही आहे.
या घटनेनंतर लष्कर-ए-जहांगी या आतिरेगी संघटनेचा या हल्ल्यात हात असल्याचे समोर आले. त्यांना संघाचे नुकसान करायचे होते. तसेच त्यांना एका खेळाडूला किडनॅप करुन त्यांची मागणी पुर्ण करुन घ्यायची होती, असे वृत्त नंतर आले होते. तसेच या घटनेबद्दल बरीच चौकशी झाली. पण या घटनेमुळे पाकिस्तानी क्रिकेट चाहत्यांना मात्र पुढील काही वर्षे क्रिकेटचा आनंद घेता आला नाही. हा हल्ला झाला त्यावेळी भारतीय संघ न्यूझीलंड दौऱ्यावर गेला होता आणि पहिला वनडे सामना खेळत होता. तो सामना सुरु असतानाच त्यांना या हल्ल्याचे वृत्त कळाल्याने सामन्याच्या अर्ध्यातूनच भारत आणि न्यूझीलंड संघाच्या खेळाडूंनी श्रीलंका खेळाडूंच्या सन्मानार्थ हाताला काळी पट्टी बांधली होती.
तसेच काही दिवसांनी जेव्हा भारतीय संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर होता आणि श्रीलंका संघाच्या बसचा ड्राईव्हर खलीलही तिकडे गेला होता तेव्हा तो धोनी आणि रैनाला देखील भेटला होता. तेव्हा धोनीने ‘तू खूप शूर आहेस, तू त्यांना वाचवलंस’, असे खलीलला म्हटले होते.
या घटनेनंतर आता जवळजवळ १३ वर्षांनी हळूहळू का होईना पाकिस्तानमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट पुन्हा परतत आहे. यासाठी श्रीलंका क्रिकेट बोर्डाने पुन्हा एकदा धैर्य दाखवून त्यांचा संघ पाकिस्तान दौऱ्यावर पाठवला होता. तसेच पाकिस्तान सुपर लीगही आता पाकिस्तानमध्ये आयोजित करण्यात येते. तरी साल २००८ नंतर भारतीय संघ पाकिस्तान दौऱ्यावर कधीही गेला नाही. शिवाय भारतीय संघाने पाकिस्तानसोबत आता केवळ आयसीसी किंवा आशियाई क्रिकेटच्या स्पर्धेतच सामने खेळले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
बापरे बाप! ५४४७ चेंडू अन् १९८१ धावा, इतिहासातील सर्वात मोठी कसोटी; ‘इतके’ दिवस चाललेला सामना
‘त्या’ भीषण घटनेची १३ वर्षे! आजच्याच दिवशी श्रीलंकन संघावर पाकिस्तानमध्ये झाला होता दहशतवादी हल्ला
विराट १०० वा कसोटी करणार खास? ३८ धावा करताच सचिन, द्रविड, सेहवागच्या पंक्तीत बसण्याची संधी