भारत आणि इंग्लंड यांच्यादरम्यान चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना चेन्नई येथे खेळला जात आहे. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी इंग्लंडने पहिल्या डावात उभारलेल्या ५७८ धावांच्या प्रत्युत्तरात भारतीय फलंदाजांनी तिसऱ्या दिवसाखेर ६ बाद २५७ धावा काढल्या आहेत. दरम्यान भारतीय संघाच्या खराब क्षेत्ररक्षणावर माजी भारतीय क्रिकेटपटू युजवेंद्र सिंग यांनी प्रश्नचिन्ह उभे केले आहे. भारतीय खेळाडू क्षेत्ररक्षणाकडे गंभीरतेने पहात नाही, असा आरोप त्यांनी केला.
भारतीय खेळाडूंनी केले खराब क्षेत्ररक्षण
चेन्नई कसोटीच्या पहिल्या दोन दिवशी इंग्लंडच्या फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांची चांगलीच परीक्षा घेतली. इंग्लंडने १९० षटके खेळत ५७८ धावा काढल्या. या दरम्यान भारतीय क्षेत्ररक्षकांनी इंग्लिश फलंदाजांचे ४ सोपे झेल सोडले. यष्टिरक्षक रिषभ पंत, चेतेश्वर पुजारा, रोहित शर्मा व रविचंद्रन अश्विन यांना झेल टिपण्यात अपयश आले. पंतने रॉरी बर्न्स, पुजारा व अश्र्विनने स्टोक्स तर रोहितने बेसला जीवदान दिले.
युजवेंद्र सिंग यांनी साधला भारतीय क्षेत्ररक्षकांवर निशाणा
भारताचे माजी क्रिकेटपटू व आपल्या वेळचे सर्वोत्तम क्षेत्ररक्षक राहिलेले युजवेंद्र सिंग यांनी भारतीय क्षेत्ररक्षकांच्या खराब कामगिरीवर निशाणा साधला. ते म्हणाले, “भारतीय खेळाडूंनी सोडलेल्या या झेलांकडे तुम्ही कसे पाहता? माझ्या मते, भारतीय खेळाडू सरावादरम्यान क्षेत्ररक्षणाला तितक्या गांभीर्याने घेत नाहीत. भारतीय संघाला सामन्याआधी सरावासाठी फक्त तीन दिवसांचा अवधी मिळाला होता. त्यांनी या काळात फलंदाजी व गोलंदाजीवर जास्त लक्ष केंद्रित केले. कदाचित झेल घेण्याचा त्यांनी सरावच केला नाही.”
युजवेंद्र सिंग आपले म्हणणे पुढे नेताना सांगितले, “तुम्ही तुमचे सर्वोत्तम क्षेत्ररक्षक फलंदाजा जवळ तैनात केले पाहिजे. जवळच्या क्षेत्ररक्षणासाठी खूप सराव करावा लागतो. तिथे रोहित अथवा गिल यांना उभे करून चालणार नाही. मला आश्चर्य वाटत होते की, रहाणे फलंदाजापासून दूर क्षेत्ररक्षण करत होता.” युजवेंद्र सिंग यांनी १९७७ मध्ये वेस्ट इंडिज विरुद्धच्या बेंगलोर कसोटीत ७ झेल घेण्याचा कारनामा केला होता.
महत्वाच्या बातम्या:
दुर्दैवी! वेस्टइंडीजच्या महिला संघाला विश्वविजेता बनवणाऱ्या माजी गोलंदाजाचे कारच्या धडकेने निधन
BAN vs WI : पदार्पणवीर कायले मेयर्सचे अद्भुत द्विशतक, वेस्ट इंडिजचा बांगलादेशवर संस्मरणीय विजय
द्विशतक एक विक्रम अनेक! वेस्ट इंडिजच्या काईल मेयरने मोठ्या पराक्रमांसह गाजवले पदार्पण