भारताने आयसीसी पुरूष टी२० विश्वचषक २०२६ची सुरूवात चांगली केली. गतविजेत्याने चारही साखळी सामने जिंकत सुपर-८मध्ये प्रवेश केला. उपांत्य फेरीच्या प्रवासात पहिलाच धक्का भारताला बसला. त्यामुळे आता भारताला उर्वरित दोन सामन्यांमध्ये मोठ्या फरकाने विजय मिळवावा लागणार आहे. यामध्ये भारताला वेस्ट इंडिज आणि झिम्बाब्वेशी दोन हात करावे लागणार आहे. झिम्बाब्वेची या स्पर्धेतील कामगिरी पाहता भारतासमोर एक आव्हान असणार आहे, मात्र एक गोष्ट चांगली ती म्हणजे २००२नंतर दोन्ही संघांमध्ये भारतात एकही सामना खेळला गेला नाही.
या सामन्याचा काय निकाल लागला आणि जेव्हा हा सामना खेळला गेला तेव्हा ईशान किशन आणि अभिषेक शर्मा किती वर्षाचे होते ते पण जाणून घेऊ. तसेच दोन्ही संघ टी२० विश्वचषकात एकमेकाविरोधात खेळले की नाहे ते ही पाहू.
२०२२चा तो टी२० विश्वचषक. ऑस्ट्रेलियाच्या वेगवान खेळपट्टीवर भारत आणि झिम्बाब्वे समोरा-समोर आले. मेलबर्नमध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात भारताचे सध्या संघात असलेले सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल आणि अर्शदीप सिंगही खेळले. तेव्हा सूर्यकुमारने नाबाद ६१ धावा केल्या होत्या. त्याने २५ चेंडूत ६चौकार आणि ४ षटकार मारत ही खेळी केली होती. केएल राहुलनेही ५१ धावा केल्याने भारताने २० षटकात ५ विकेट्स गमावत १८६ धावा केल्या होत्या.
प्रत्युत्तरात झिम्बाब्वे ११५ धावांवरच निपटला. त्यामध्ये भारताकडून अश्विनने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या होत्या. त्याने ४ षटकात २२ धावा देत ही कामगिरी केली होती. तसेच झिम्बाब्वेने भारतात एकही टी२० सामना खेळला नाही. त्यांनी शेवटचा सामना वनडे प्रकारातील खेळला होता.
ती वनडे मालिका २-२ अशी बरोबरीत असताना शेवटचा सामना गुवाहाटीमध्ये खेळला गेला होता. त्यामध्ये भारताने दिनेश मोंगियाच्या जबरदस्त खेळीमुळे झिम्बाब्वेसमोर ३३४ धावांचे लक्ष्य ठेवले होते. तेव्हा झिम्बाब्वे सर्व विकेट्स गमावत २३२ धावांपर्यंतच मजल मारू शकला आणि हा सामना भारताने जिंकला होता. त्यामध्ये मोंगियाने नाबाद १५९ धावा केल्या होत्या.
त्यामुळे आता तब्बल २४ वर्षानंतर हे दोन संघ भारतीय भुमीवर समोरा-समोर येणार आहेत. हा सामना २६ फेब्रुवारीला चेन्नईच्या एमए चिंंदबरम स्टेडियमवर खेळला जाणार आहे. जेव्हा भारतात झिम्बाब्वेने त्यांचा शेवटचा सामना खेळला तेव्हा ईशान किशनचा जन्म १९९८ला झाला असून तो तेव्हा ४ वर्षाचा होता.






