क्रिकेटमध्ये कसोटी सामन्यांचा इतिहास अतिशय जुना आहे. याचे कारण क्रिकेटची सुरुवात ही कसोटी सामन्यांपासूनच झाली होती. 1877 मध्ये कसोटी सामन्यांना सुरुवात झाली. तेव्हापासून आजवर तब्बल 2 हजार 387 कसोटी सामने झाले आहेत. “क्रिकेट इतिहासात पहिला कसोटी सामना, ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड संघात मेलबर्न येथे झाला होता.”
2020 या वर्षाची सुरुवात होईपर्यंत सुमारे 13 संघानी कसोटी क्रिकेट खेळले आहे. यात ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या संघांसह दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडीज, न्युझीलंड, भारत, पाकिस्तान, श्रीलंका, झिम्बाम्ब्वे, बांगलादेश, अफगाणिस्तान, आयर्लंड आणि आईसीसी वर्ल्ड इलेव्हन या संघांचा समावेश आहे.
कसोटी सामन्याचे लागू शकतात ४ निकाल
कोणताही संघ हा सामना जिंकण्याच्या इराद्यानेच मैदानावर पाऊल ठेवत असतो. तसेच जिंकण्यासाठी प्रचंड मेहनत घेत असतो. त्यातूनच काही सामने हे फक्त विजय- पराजय असे न राहता, ते अनिर्णित अवस्थेत तर काही सामने बरोबरीत सुटतात. मात्र, कसोटी क्रिकेटच्या आजवरच्या इतिहासात फक्त दोनच सामने असे झाले आहेत, जे बरोबरीत सुटले आहेत.
या लेखात आपण ते दोन्ही ऐतिहासिक कसोटी सामने पाहणर आहोत. तसेच हे सामने कोणत्या अवस्थेत बरोबरीत सुटले, ते पाहणार आहेत.
कसोटी क्रिकेटमधील पहिला बरोबरीचा सामना
- ऑस्ट्रेलिया विरुद्ध वेस्ट इंडीज (9 डिसेंबर ते 14 डिसेंबर, 1960)
कसोटी क्रिकेटमध्ये पहिला बरोबरीत सुटलेला सामना ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडीज यांच्यात झाला होता. 1960-61 मध्ये वेस्ट इंडीज संघ पाच कसोटी सामन्यांच्या मालिकासाठी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आला होता. त्यातील पहिला सामना ब्रिस्बेन येथे खेळवण्यात आला होता.
वेस्ट इंडीज संघाचे कर्णधार सर फ्रँक वॉरेल यांनी नाणेफेक जिंकत पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर वेस्ट इंडीज संघाने सर गॅरी सोबर्स (132) यांच्या शतकाच्या मदतीने 453 धावा बनवल्या. त्याला उत्तरादाखल ऑस्ट्रेलिया संघाने नॉर्म ओ’नील यांच्या 181 आणि बॉब सिम्पसन यांच्या 92 धावांच्या मदतीने 505 धावा बनवल्या आणि पहिल्या डावात 52 धावांची आघाडी घेतली होती.
दुसरा डाव सुरु झाल्यानंतर वेस्ट इंडीज संघाने कर्णधार फ्रँक वॉरेल आणि रोहन कन्हाई यांच्या अर्धशतकांच्या जोरावर 284 धावा केल्या आणि यजमान ऑस्ट्रेलिया संघापुढे 233 धावांचे लक्ष्य ठेवले. ऑस्ट्रेलिया संघाच्या एलन डेविडसन या गोलंदाजाने पहिल्या डावात 5 बळी आणि दुसऱ्या डावात 6 बळी घेत वेस्ट इंडीज संघाचा धावफलक रोखण्यात यश मिळवले होते.
233 धावांचा पाठलाग करताना एक वेळ अशी झाली होती, जेव्हा ऑस्ट्रेलिया संघाने 92 धावात आपले 6 खेळाडू गमावले होते. मात्र, त्यानंतर एलन डेविडसन याने 80 धावांची महत्वपुर्ण खेळी करत संघाला पराजयाच्या वाटेवरुन बाहेर काढले. सातव्या विकेटसाठी डेविडसन याने कर्णधार रिची बेनॉ (52) याच्यासह 134 धावांची महत्वपुर्ण भागिदारी केली.
ऑस्ट्रेलिया संघाचा धावफलक तेव्हा 6 बाद 226 असा झाला होता. ऑस्ट्रेलिया आता सामना जिंकणार असे वाटत होते. मात्र, त्यानंतर वेस्ट इंडीज संघाने सामन्यात जोरदार पुनरागमन केले आणि सामना जिंकायला 7 धावांची गरज असणाऱ्या ऑस्ट्रेलिया संघाच्या 4 फलंदाजांना अवघ्या 6 धावा देत बाद केले.
ऑस्ट्रेलियाचा संपूर्ण संघ 232 धावांत बाद झाला आणि अतिशय रंगतदार अवस्थेत झालेला हा सामना, अखेरीस बरोबरीत सुटला.
कसोटी क्रिकेटमधील दुसरा बरोबरीचा सामना
- भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (18 सप्टेंबर ते 22 सप्टेंबर, 1986)
1986 साली ऑस्ट्रेलिया संघ तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी भारत दौऱ्यावर आला होता. ज्यातील पहिला सामना मद्रास (चेन्नई) येथे खेळवण्यात आला होता.
चेन्नई येथील त्या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. डीन जोन्स (210) यांच्या तडाखेबंद द्विशतक व डेविड बून (122) आणि कर्णधार एलन बॉर्डर (106) यांच्या शानदार शतकांच्या जोरावर ऑस्ट्रेलिया संघाने भारतापुढे 7 बाद 574 इतका मोठा धावांचा डोंगर उभा केला होता.
भारतीय संघाने आपल्या पहिल्या डावात कर्णधार कपिल देव (119) यांच्या शतकाच्या जोरावर आणि रवी शास्त्री, के. श्रीकांत, मोहम्मद अझरुद्दीन यांच्या अर्धशतकांच्या जोरावर 397 धावा बनवल्या. ज्यामुळे ऑस्ट्रेलियाला पहिल्या डावात 177 धावांची आघाडी मिळाली होती.
त्यानंतर ऑस्ट्रेलिया संघाने दुसऱ्या डावात फक्त 5 फलंदाजांना फलंदाजी करू दिली आणि संघाचा धावफलक 170 वर पोहचल्यानंतर डाव घोषीत केला. ज्यात सर्वाधिक धावा डेविड बून (49) याने केल्या होत्या.
भारतीय संघाला आता विजयासाठी 348 धावांचे कठीण लक्ष्य मिळाले होते. परंतु, भारताने सुनील गावसकर यांच्या 90 धावा आणि मोहिंदर अमरनाथ यांच्या 51 धावांच्या मदतीने सुरुवातीलाच अवघे 3 फलंदाज गमावत 251 धावा बनवल्या होत्या. त्यामुळे सदर सामना भारत जिंकू शकेल, असे वाटले होते.
परंतु, त्याच वेळेपासून ऑस्ट्रेलियाने सामन्यात जोरदार पुनरागमन केले. तरिही, 6 बाद 331 धावा अशा अवस्थेतील भारतीय संघाची सामन्यावर पकड मजबूत वाटत होती. त्यानंतर ऑस्ट्रेलिया संघाच्या गोलंदाजांनी कमाल करत अवघ्या 16 धावांत भारताचे 4 खेळाडू तंबूत धाडले. त्यामुळे भारताचा संघ 347 धावांवर सर्वबाद झाला आणि अखेरीस हा सामना बरोबरीत सुटला.
खरे तर त्या सामन्यातील दुसऱ्या डावात भारताच्या रवी शास्त्री यांनी एका बाजूने सातत्याने फलंदाजी करताना नाबाद 48 धावांची खेळी केली. परंतु त्यांची खेळी संघाला विजय मिळवून देऊ शकली नाही.
ऑस्ट्रेलिया संघाकडून पहिल्या डावात 5 बळी टिपणाऱ्या ग्रेग मॅथ्यूज याने दुसऱ्या डावात देखील भारताच्या 5 फलंदाजांना तंबूची वाट दाखवली होती. त्या व्यतिरिक्त रे ब्राइट याने देखील दुसऱ्या डावात 5 विकेट घेतल्या होत्या. मात्र, डीन जोन्स यांना त्यांच्या द्विशतकाबद्दल ‘सामनावीर’ म्हणून गौरवण्यात आले होते.