भारत आणि इंग्लंड यांच्यादरम्यान चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना चेन्नई येथे खेळला जात आहे. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी इंग्लंडने पहिल्या डावात उभारलेल्या ५७८ धावांच्या प्रत्युत्तरात भारताने चहापानापर्यंत ४ बाद १५४ धावा केल्या आहेत. मात्र, भारतीय गोलंदाजांनी पहिल्या डावात गोलंदाजी करताना एक नकोसा विक्रम आपल्या नावे नोंदवून घेतला. भारताकडून एका डावात सर्वाधिक ‘नोबॉल’ टाकण्याची नकोशी कामगिरी या संघाने केली.
भारतीय गोलंदाजांचा संघर्ष
पाहुण्या इंग्लंड संघाने चेन्नई कसोटीत पहिल्या दोन दिवशी भारतीय गोलंदाजांची चांगली परीक्षा घेतली. इंग्लंडचा कर्णधार जो रूटने विक्रमी २१८ धावांची खेळी केली. तसेच, डॉम सिबली व अष्टपैलू बेन स्टोक्स यांनी प्रत्येकी ८७ आणि ८३ धावांचे योगदान दिले. इंग्लंड संघाने सर्वबाद होण्यापूर्वी ५७८ धावांचा डोंगर उभारला. भारतीय संघाने तिसऱ्या दिवशी सकाळपर्यंत १९०.१ षटके गोलंदाजी करून इंग्लंडला रोखले. भारताकडून बुमराह व अश्विनने प्रत्येकी तीन तर नदीम व ईशांत शर्मा यांनी प्रत्येकी दोन बळी आपल्या नावे केले.
भारतीय गोलंदाजांचा नकोसा विक्रम
भारतीय गोलंदाजांनी इंग्लंडच्या पहिल्या डावात एकूण २० नोबॉल टाकले. जे भारताकडून आतापर्यंत सर्वाधिक आहेत. जसप्रीत बुमराहने ७, शहाबाज नदीमने ६ तर इशांत शर्माने ५ नोबॉल टाकले. उर्वरित दोन नोबॉल आर अश्विनने टाकले आहेत. भारतीय संघाने यापूर्वी २०१० मध्ये श्रीलंका दौऱ्यावरील कोलंबो येथे झालेल्या तिसऱ्या कसोटीत १६ नोबॉल टाकले होते. एका आंतरराष्ट्रीय कसोटीतील एका डावात सर्वाधिक नोबॉल टाकण्याचा नकोसा विश्वविक्रम श्रीलंका संघाच्या नावे आहे. चितगाव येथे २०१४ मध्ये बांगलादेश विरुद्ध झालेल्या कसोटीत त्यांनी ही लाजिरवाणी कामगिरी केली होती.
ईशांत शर्माचा प्रशिक्षकांनी केली पाठराखण
भारतीय संघाचा अनुभवी वेगवान गोलंदाज ईशांत शर्मा याचे लहानपणीचे प्रशिक्षण श्रवण कुमार यांनी भारतीय गोलंदाजांची पाठराखण केली. ते म्हणाले, “कोरोना महामारीमुळे लागलेल्या लॉकडाऊनंतर खेळाडू परिस्थितीशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. कधीकधी फलंदाजावर अतिरिक्त दबाव टाकण्याच्या प्रयत्नात नोबॉल पडतात. खेळाडू लवकरच यातून शिकतील.”
महत्त्वाच्या बातम्या –
यशस्वी जयस्वालची तुफानी शतकी खेळी, मात्र अर्जुन तेंडुलकर फ्लॉप
एक असा दर्शक, जो कसोटीतील दोन्ही १० विकेट हॉलचा साक्षीदार ठरला
अबब! फक्त ३ विकेट्स घेण्यासाठी अश्विनने टाकले ३०० हून जास्त चेंडू