जेव्हा एखादा खेळाडू क्रिकेट खेळण्यास सुरुवात करतो, तेव्हा त्याची सर्वात मोठी इच्छा असते कि एक दिवस आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी आपल्याला मिळावी. काही भाग्यवान खेळाडूंना ही संधी मिळते परंतु काही खेळाडूंना ही संधी मिळत नाही.
चाहत्यांना नेहमीच त्यांच्या आवडत्या खेळाडूंना खेळताना पहायचे असते, परंतु एक दिवस त्या दिग्गज खेळाडूंनाही खेळातून निवृत्ती घ्यावी लागते. जेव्हा ते क्रिकेटचा निरोप घेतात तेव्हा तो क्षण चाहते आणि खेळाडू दोघांनासाठीही भावनिक असतो.
या लेखात भारतीय संघातील त्या २ क्रिकेटपटूंबद्दल आढावा घेण्यात आला आहे, ज्यांचा शेवटचा सामना खूपच संस्मरणीय होता.
२. सौरव गांगुली (Sourav Ganguly)
दि. ११ जानेवारी १९९२ मध्ये वेस्ट इंडिज विरुद्ध सौरव गांगुलीने वनडे सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये पदार्पण केले. १९९२- २००८ पर्यंत गांगुलीने भारतीय संघासाठी खूप मोलाचं योगदान दिले. त्याने शेवटचा कसोटी सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध ६ नोव्हेंबर २००८ रोजी नागपुर मध्ये एमएस धोनीच्या नेतृत्वात खेळला होता.
त्यावेळी धोनीने गांगुलीच्या सन्मानार्थ शेवटच्या काही षटकांत त्याला नेतृत्व करण्यास सांगितले आणि गांगुलीनेही पूर्ण आदर राखला. शेवटच्या सामन्यात सौरव गांगुलीने ८५ धावा केल्या होत्या आणि भारताने हा सामना १७२ धावांनी जिंकला होता.
सामन्यानंतर संपूर्ण संघातील खेळाडूंनी गांगुलीला खांद्यावर उचलले आणि सन्मानपूर्वक निरोप दिला होता. त्याने ११३ कसोटी सामने आणि ३११ वनडे सामने खेळले. सौरव गांगुलीचा निरोप कसोटी सामना नेहमीच लक्षात राहील.
१. सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar)
२४ वर्षे भारतीय क्रिकेटची सेवा करणाऱ्या सचिन तेंडुलकरने जेव्हा शेवटचा सामना खेळला तेव्हा सर्वांचे डोळे ओले झाले होते. सचिनने नोव्हेंबर १९८९ मध्ये कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान विरुद्ध आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीची सुरुवात केली होती. १९८९-२०१३ या २४ वर्षात बरेच विक्रम त्याने आपल्या नावावर केले. भारतीय संघाला खूप मोठं योगदान दिले आणि क्रिकेटचा देव म्हणून तो नावारूपाला आला. १९९६ ते २००० या काळात सचिनने ७३ वनडे सामन्यांमध्ये भारतीय संघाचे नेतृत्वही केले.
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने आपल्या कारकीर्दीतील शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना त्याच्या घरच्या मैदानावर म्हणजे वानखेडे स्टेडियमवर नोव्हेंबर २०१३मध्ये वेस्ट इंडिज विरुद्ध खेळला होता.
त्या कसोटी सामन्यात त्याने ७४ धावांची खेळी केली होती. सामन्यानंतर जेव्हा त्याने भाषण देणे सुरू केले तेव्हा सचिनसह स्टेडियममध्ये उपस्थित सर्व खेळाडू, प्रेक्षक आणि टीव्हीवर पाहणारे प्रत्येक क्रिकेट चाहत्यांचे डोळे पाणावले होते. सचिनने खेळपट्टीला केलेलं ते शेवटचं वंदन आठवले की आजही अनेकांचे डोळे पाणावतात.
त्या सामन्यादरम्यान सौरव गांगुली आणि राहुल द्रविड यांच्यासह अनेक दिग्गज खेळाडू स्टेडियमवर उपस्थित होते. हेच कारण होते की हा सामना खूप संस्मरणीय बनला. सचिन तेंडुलकरचा तो सामना वर्षानुवर्षे लक्षात राहील.