बुधवारी आयपीएल 2025 मध्ये गुजरात टायटन्स (GT) ने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) वर 8 विकेट्सने विजय मिळवला. गुजरातने 13 चेंडू शिल्लक असताना 170 धावांचे लक्ष्य सहज गाठले. चालू हंगामात आरसीबीचा हा पहिलाच पराभव आहे. या दारुण पराभवानंतर, आरसीबीचा कर्णधार रजत पाटीदारने कटू सत्य कबूल केले आहे. त्याचा असा विश्वास आहे की आरसीबीने सुमारे 20-25 धावा कमी केल्या. सुरुवातीला विकेट गमावल्यामुळे झालेले नुकसान भरून निघू शकत नाही, असेही त्याने सांगितले.
गुजरातविरुद्धच्या पराभवानंतर, जेव्हा पाटीदारला विचारण्यात आले की आरसीबीने किती धावा करायला हव्या होत्या, तेव्हा तो म्हणाला, “200 नाही तर आमचे लक्ष्य 190 धावांच्या आसपास पोहोचण्याचे होते. सुरुवातीला विकेट गमावल्याने या सामन्यात आम्हाला त्रास झाला. जरी हेतू चांगला होता पण पॉवरप्लेमध्ये आम्हाला तीन विकेट गमावायला नको होत्या. दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी खेळपट्टी थोडी चांगली झाली आणि गोलंदाजांनी कठोर परिश्रम केले.”
पुढे तो म्हणाला, “खेळपट्टी (फलंदाजीसाठी) थोडी चांगली झाली आणि गोलंदाजांनी या धावसंख्येचा बचाव करण्याचा प्रयत्न केला. या मैदानावर सामना 18व्या षटकात गेला हे पाहून खूप आनंद झाला.” आरसीबीच्या कर्णधाराने तीन खेळाडूंच्या फलंदाजीचे कौतुक केले. पाटीदार म्हणाला, “जितेश, लियाम लिव्हिंगस्टोन आणि टिम डेव्हिड यांनी ज्या पद्धतीने फलंदाजी केली ती आमच्यासाठी सकारात्मक गोष्ट होती. आम्हाला फलंदाजी लाइनअपवर पूर्ण विश्वास आहे. ते सकारात्मक हेतू दाखवत आहेत, जे आमच्यासाठी खूप चांगले लक्षण आहे.”
सामन्यात एकेकाळी आरसीबीने 4 बाद 42 धावा केल्या होत्या पण लिव्हिंगस्टोनने (54) अर्धशतक झळकावून डाव सावरला. त्याने जितेश शर्मा (33) सोबत पाचव्या विकेटसाठी 52 आणि टिम डेव्हिड (32) सोबत सातव्या विकेटसाठी 46 धावांची भागीदारी करत आरसीबीला 169/8 अशी आव्हानात्मक धावसंख्या गाठून दिली. फिल साॅल्ट (14), पाटीदार (12), विराट कोहली (7) आणि देवदत्त पडिक्कल (4) हे सर्व खेळाडू स्वस्तात बाद झाले. आरसीबी त्यांचा चौथा सामना 10 एप्रिल रोजी दिल्ली कॅपिटल्स (DC) विरुद्ध खेळेल.