मुंबई । भारताचा माजी सलामीवीर आणि विद्यमान खासदार गौतम गंभीर यांनी निवड समितीचे माजी अध्यक्ष एमएसके प्रसाद यांच्या निर्णयावर नाराजी व्यक्त करत प्रश्नचिन्ह उभे केले आहे. गतवर्षी 2019 साली इंग्लंडमध्ये साली झालेल्या विश्वकरंडक स्पर्धेत भारताच्या पराभवाचे खापर गंभीरने एमएसके प्रसाद यांच्या वरती फोडले आहेत. चुकीच्या पद्धतीने भारतीय संघ निवडण्यात आल्याने भारताचा पराभव झाला असल्याचे गौतम गंभीर म्हणाला.
गौतम गंभीर म्हणाला की निवड समितीचे अध्यक्ष एमएसके प्रसाद यांच्यावर आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने खेळण्याचा अनुभव कमी होता. अंबाती रायडू ऐवजी त्यांनी विश्वकरंडकात विजय शंकर याला पसंती दिली. एका मोठ्या स्पर्धेत संघ निवडण्यासाठी निवड समितीकडे दांडगा अनुभव हवा. तो एमएसके प्रसाद यांच्याकडे नव्हता. अंबाती रायडू हा गेल्या दोन वर्षांपासून भारतीय संघात चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करत होता. अचानक त्याच्या ऐवजी अष्टपैलू म्हणून विजयला पसंती दिल्याने गौतम गंभीरने नाराजी व्यक्त केली.
गौतम गंभीरच्या मते आता संघ निवडताना कर्णधार विराट कोहली यांच्या मताचा विचार घेणे आवश्यक आहे. खेळाडूंची निवड करताना कर्णधाराला मतदानाचा पूर्ण अधिकार हवा. गौतम गंभीरच्या विधानाला प्रत्युत्तर देताना एमएसके प्रसाद म्हणाले की, प्रत्येक निर्णय घेण्यापाठीमागे काहीतरी कारणे असतात. निवड समितीच्या प्रक्रियेमध्ये कर्णधाराचा महत्त्वपूर्ण रोल असतो. यात दुमत नाही पण नियमानुसार त्याला मतदान करता येत नाही.