मुंबई। क्रिकेटविश्वात महान कर्णधार, महान यष्टीरक्षक, सर्वोत्कृष्ट फिनिशर आणि सर्वश्रेष्ठ फलंदाज अशा वेगवेगळ्या रुपात ख्याती मिळवणारा क्रिकेटपटू म्हणजे एमएस धोनी. याच धोनीचा आज 40 वा वाढदिवस आहे.
धोनीने रांचीसारखे छोट शहर सोडून महानगरांमध्ये बंदिस्त असलेल्या क्रिकेटच्या चमकदार जगात स्वत:चे स्थान निर्माण केले. धोनीने तरुणांना स्वप्न पाहण्यास व ते पूर्ण करण्यासाठी प्रोत्साहित केले. त्याच्या कारकीर्दीत दोन विश्वचषक जिंकले. त्याचे हे आकडे सांगतात की इच्छाशक्ती मजबूत असेल तर काहीपण मिळवू शकतो. त्याची ही कामगिरी भारतीय क्रिकेटच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिली गेली आहे.
यशाच्या शिखरावर असताना एक दिवस त्याने यापूर्वी अचानक कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. शंभर कसोटी सामने खेळण्याचा विक्रम पूर्ण करण्याआधीच त्याने कसोटी क्रिकेटला बाय-बाय केला. त्याने एकूण 90 कसोटी सामन्यात भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले. त्यानंतर पाच वर्षे आणि सात महिन्यानंतर 15 ऑगस्ट दिवशी भारत देश आपला 74 वा स्वातंत्र्यदिन साजरा करत असताना धोनीने अचानक निवृत्तीची घोषणा केली.
धोनीने त्याच्या चेहऱ्यावर कधीच भावना दाखवून दिल्या नाहीत. इतकेच नव्हे तर त्याच्या मनात काय चालले आहे हे त्याच्या सोबत राहणाऱ्या संघ सहकाऱ्याला देखील कळत नव्हते.
क्रिकेटच्या मैदानावरील त्यांचे आयुष्य हे एक खुले पुस्तक आहे परंतु त्याने कधीही वैयक्तिक जीवनाची पाने उलगडली नाहीत. विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत धावबाद झाल्यानंतर गेल्या एका वर्षात त्याच्याबद्दल बर्याच प्रकारचे तर्कवितर्क लावले जात होते. पण त्याने मौन सोडले नाही.
धोनीची कहाणी फक्त क्रिकेटची नाही तर क्रिकेट विश्वात बदल घडवणारी ही कथा आहे. मोठ्या शहरांमध्ये मुले क्रिकेट खेळताना पाहून तो आपल्या पिढीतील कोट्यावधी तरुणांसाठी रोल मॉडेल बनला, ज्यांना हातात बॅट किंवा बॉल धरायची इच्छा होती पण ती पूर्ण करण्याची हिम्मत नव्हती.
परंपरेच्या पलीकडे विचार करणे आणि कौशल्यावर अवलंबून राहणे हे त्याचे वैशिष्ट्य होते. यामुळे टी 20 विश्वचषक 2007 च्या अंतिम सामन्यात त्याने शेवटचे षटक जोगिंदर शर्मा याला दिले, अनेकांना त्याचे नाव देखील माहित नव्हते. त्या सामन्याने शर्माला हिरो बनवलं. धोनी त्या शहरातून पुढे आला जिथे युवक आयआयटी, जीई किंवा यूपीएससीची तयारी करतात, पण बालपणी प्रशिक्षक केशव रंजन बॅनर्जी यांच्या म्हणण्यानुसार धोनीच्या यशाने येथील ही विचारसरणी बदलली. भारतीय क्रिकेट नेहमीच त्याचे ऋणी असेल.
धोनीने कोणत्याही मीडियाला कधी ‘एक्सक्लुझिव्ह’ मुलाखत दिली नाही. त्याचे माध्यमांशी नाते जेमतेम आहे. सामान्य पत्रकार परिषदेतही अनेक प्रश्नांची उत्तरे देण्यात तो पारंगत होता. विश्वचषक 2015 च्या उपांत्य सामन्यानंतर तो म्हणाला होता, ”मी बाबांना (तत्कालीन संघ व्यवस्थापक) नेहमी सांगतो की जर मीडिया आपल्या कामावर खूष असेल तर याचा अर्थ असा की आपण आपले कार्य व्यवस्थित करीत नाही.”
आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणात धोनीच्या चेन्नई सुपर किंग्जचे नाव आल्यानंतर, 2013 च्या चॅम्पियन्स करंडक स्पर्धेसाठी टीम इंडिया जाण्यापूर्वी त्याच्यावर प्रश्नांचा भडीमार केला होता, परंतु त्याने स्मितहास्य करत उत्तर दिले.
कर्णधार विराट कोहलीने म्हटले होते की, त्याचा कर्णधार नेहमीच धोनीच असेल. धोनीच्या उपस्थितीमुळे विराटचे काम नेहमीच सोपे होत होते. भारतीय क्रिकेटमध्ये बरेच महान खेळाडू आहेत आणि पुढेही होतील, पण कर्णधाराची दिशा स्वत: च्या दृष्टीने निश्चित करणार्या ‘कॅप्टन कूल’ धोनीसारखा कर्णधार आणि खेळाडू शतकातून एकदाच जन्माला येतो.