न्यूझीलंडविरुद्ध कसोटी मालिकेत भारताने १-० असा विजय मिळवल्यानंतर आता भारतीय संघ दक्षिण अफ्रिका दौऱ्यावर जाणार आहे (India tour of South Africa). दक्षिण अफ्रिका दौऱ्यावर भारताला तीन कसोटी आणि तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिका खेळायच्या आहेत. यातील कसोटी मालिका २६ डिसेंबर पासून सुरू होणार आहे. तत्पूर्वी, बुधवारी (८ डिसेंबर) बीसीसीआयने या दौऱ्यासाठी १८ सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. आता संघ १६ डिसेंबरला दक्षिण अफ्रिकेसाठी रवाना होणार आहे. कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याच्या नेतृत्वात कसोटी संघ दक्षिण अफ्रिकेविरुद्ध चांगले प्रदर्शन करेल अशी सर्वांना अपेक्षा आहे.
मागच्या ५-६ वर्षात भारतीय संघाने कसोटी प्रकारात चांगले प्रदर्शन केले आहे. भारताने स्वदेशात आणि विदेशात दोन्ही ठिकाणी चांगले प्रदर्शन करून दाखवले आहे. यादरम्यान भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला त्यांच्या मायदेशात दोन वेळा कसोटी मालिकेत पराभूत केले. तसेच काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या इंग्लंड दौऱ्यातही भारतीय संघाने चांगेल प्रदर्शन करून दाखवले होते.
भारताने इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली होती, पण ऐन वेळी मालिकेतील शेवटचा सामना स्थगित करण्यात आला. आता मालिकेतील हा शेवटचा सामना पुढच्या वर्षी जुलै महिन्यात खेळला जाणार आहे. आता भारतीय संघा अशाच प्रकारे दक्षिण अफ्रिकेत देखील प्रदर्शन करेल, अशी चाहत्यांनी इच्छा आहे. आपण या लेखात त्या कारणांवर नजर टाकणार आहोत, ज्यामुळे भारत दक्षिण अफ्रिका दौऱ्या विजय मिळवू शकतो.
दक्षिण अफ्रिका संघाचा फलंदाजी क्रम कमजोर
दक्षिण अफ्रिकेतील परिस्थिती वेगवान गोलंदाजांसाठी फायदेशीर ठरते, अशा परिस्थितीत दक्षिण अफ्रिका (South Africa) संघ सर्वात घातक संघांपैकी एक ठरतो. असे असले तरी, दक्षिण अफ्रिका संघात मागच्या काही वर्षात खूप बदल झाले आहेत. दक्षिण अफ्रिका संघात सध्या युवा खेळाडू जास्त आणि अनुभवी खेळाडूंची कमतरता आहे. डीन एल्गरच्या नेतृत्वात संघ फलंदाजीसाठी टेंबा बावुमा, एडेम मार्करम आणि रस्सी वॅन डर डुसेन यांच्यावर विश्वास ठेवेल. जर संघातील वरची फळी धाव करण्यात अपयशी ठरली, तर संघाला अडचणींचा सामना करावा लागू शकतो.
भारतीय संघाचा विचार केला, तर न्यूझीलंडविरुद्ध कसोटी मालिकेत संघातीत अनुभवी खेळाडू विश्रांतीवर होते, तरी देखील संघाने या मालिकेत विजय मिळवला. भारतीय संघाची फलंदाजी सध्या भक्कम आहे. आगामी दौऱ्यात रोहित शर्मा आणि केएल राहुल हे सलामीवीर संघात पुनरागमन करणार आहेत. तर संघात विराट कोहली, अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारा असे अनुभवी खेळाडूंबरोबर श्रेयस अय्यर, रिषभ पंत असे युवा खेळाडू देखील आहेत.
दक्षिण अफ्रिकेतील परिस्थितीत भारतीय गोलंदाज चमकू शकतात
दक्षिण अफ्रिकेतील परिस्थिती नेहमीच वेगवान गोलंदाजांसाठी अनुकूल असते. अशात दक्षिण अफ्रिका संघाचे कगिसो रबाडा, एन्रिच नॉर्किया, लुंगी एन्गिडी आणि ब्युरेन हेड्रिक्स यांच्यासारखे वेगवान गोलंदाज भारतीय संघासाठी मोठा अडथळा निर्माण करू शकतात. आजपर्यंतचा इतिहास पहिला तर, जेव्हा जेव्हा मायदेशात कसोटी सामना खेळला आहे, तेव्हा या गोलंदाजांनी विरोधी संघावर वर्चस्व बनवलेले दिसते.
असे असले तरी, भारतीय संघाचे वेगवान गोलंदाज देखील सध्या उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहेत. अशात दक्षिण अफ्रिकेतील अनुकूल परिस्थितीत भारतीय गोलंदाज देखील विरोधी संघासाठी मोठे आव्हान ठरू शकतात. दक्षिण अफ्रिका दौऱ्यावर मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराहा यांचे संघात पुनरागमन होणार आहे. तसेच मोहम्मद सिराज आणि उमेश यादव देखील संघात सामील आहेत. दक्षिण अफ्रिकेतील परिस्थितीत भारतीय गोलंदाज देखील घातक ठरतील, यात शंका नाही.
केशव महाराजपेक्षा रविचंद्रन अश्विनकडे अधिक अनुभव
फलंदाजी आणि वेगवान गोलंदाजीनंतर भारतीय संघाकडे अजून एक जमेची बाजू आहे, ती म्हणचे संघातील फिरकी गोलंदाज. या दौऱ्यावर दक्षिण अफ्रिका संघात फिरकी गोलंदाजीची जबाबदारी केशव महाराजवर असणार आहे, तर भारतीय फिरकी गोलंदाजीची कमान रविचंद्रन अश्विनवर असेल. अक्षर पटेल आणि रवींद्र जडेजा दुखापतीमुळे या दौऱ्यात सहभगी होऊ शकणार नाहीत. अशात रविचंद्रन अश्विनसोबत जयंत यादवला संधी दिली गेली आहे. अशात अश्विनचा सध्याचा फॉर्म पाहता त्याचे संघातील स्थान पक्के समजले जात आहे.
दक्षिण अफ्रिकेच्या केशव महाराजचा विचार केला, तर तो देखील चांगला गोलंदाज आहे, पण अश्विनकडे त्याच्यापेक्षा अधिक अनुभव आहे. अशात भारतीय संघा फिरकी गोलंदाजीच्या बाबतीत देखील दक्षिण अफ्रिका संघाला मागे टाकेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
जर भारतीय संघाने अपेक्षित प्रदर्शन केले, तर भारत कसोटी क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच दक्षिण अफ्रिकामध्ये कसोटी मालिका जिंकण्याचा पराक्रम करू शकतो. तत्पूर्वी भारताने २००६ मध्ये दक्षिण अफ्रिकेत पहिल्यांदा कसोटी सामना जिंकला होत, पण या मालिकेत भारताचा २-१ असा पराभव झाला होता.
महत्वाच्या बातम्या –
सौरव गांगुलीचा तो फोन कॉल आला अन् विराटला बसला आश्चर्याचा धक्का; वाचा नक्की काय झालं
दक्षिण आफ्रिका दौरा ‘या’ ३ भारतीय खेळाडूंसाठी असू शकतो ‘करो या मरो’