मेलबर्न। आज(८ मार्च) जागतिक महिला दिनाच्या दिवशी महिला टी२० विश्वचषकाचा अंतिम सामना भारतीय महिला संघ विरुद्ध ऑस्ट्रेलिया महिला संघात सुरु आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ४ बाद १८४ धावा केल्या आहेत आणि भारताला विजयासाठी २० षटकात १८५ धावांचे आव्हान दिले आहे.
मात्र या आव्हानाचा पाठलाग करताना पहिल्या ४ षटकातच भारताने ३ विकेट्स गमावल्या आहेत. भारताने पहिल्या षटकात मेगन शटच्या गोलंदाजीवर १६ वर्षीय शेफाली वर्माची(२) विकेट गमावली.
तिच्या पाठोपाठ दुसऱ्या षटकात जेमिमाह रोड्रिग्जला जेस जोनासनने शून्य धावेवर बाद केले. या दरम्यान भारताची यष्टीरक्षक फलंदाज तानिया भाटीया फलंदाजी करताना चेंडू लागल्याने मैदानाबाहेर गेली. तर सोफी मोलिनेक्सने टाकलेल्या चौथ्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर स्रीती मंधनाने निकोला कॅरीकडे झेल दिला. ती ११ धावा करुन बाद झाली.
सध्या भारताची कर्णधार हरमनप्रीत कौर आणि दिप्ती शर्मा फलंदाजी करत आहेत.
तत्पूर्वी ऑस्ट्रेलियाकडून हिली आणि बोथ मूनीने अर्धशतकी खेळी केल्या. हिलीने ३९ चेंडूत ७५ धावा केल्या. या खेळीत तिने ७ चौकार आणि ५ षटकार मारले. तर मूनीने ५४ चेंडूत १० चौकारांसह नाबाद ७८ धावांची खेळी केली.






