---Advertisement---

बलात्काराचे आरोप, पंचांशी बाचाबाची अन् नो बॉल वाद! टी20 विश्वचषकात घडलेल्या सर्वात मोठ्या वादग्रस्त घटना

On: शनिवार, जून 1, 2024 2:41 PM
---Advertisement---

कोणत्याही चित्रपटाच्या कथेप्रमाणे, क्रिकेटच्या सामन्यातही ड्रामा आणि सस्पेन्स पाहायला मिळतो. यापूर्वी ‘डीआरएस’ यंत्रणा नसल्यामुळे खेळाडूंना पंचांच्या निर्णयाचं पालन करणं बंधनकारक होतं. मात्र गेल्या काही वर्षांत तंत्रज्ञानात सुधारणा झाली असली तरी पंचांच्या निर्णयांवरून अनेकदा वाद निर्माण झाले आहेत. विशेषतः 2022 चा टी20 विश्वचषक तर वादग्रस्त घटनांनी घेरला होता. चला तर मग, 2022 च्या विश्वचषकातील पाच सर्वात वादग्रस्त घटनांवर एक नजर टाकूया.

शाकीब अल हसन एलबीडब्ल्यू आऊट
टी20 विश्वचषक 2024 च्या गट 2 मधील बांगलादेश विरुद्ध पाकिस्तान सामना 6 नोव्हेंबर 2022 रोजी खेळला गेला. बांगलादेशचा संघ प्रथम फलंदाजी करत होता. संघाचा कर्णधार शाकीब अल हसन जेव्हा क्रीझवर आला, तेव्हा तो पहिल्याच चेंडूवर एलबीडब्ल्यू आऊट झाला. मात्र चेंडूचा आपल्या बॅटला स्पर्श झाल्याचं त्याला वाटलं, त्यामुळे त्यानं लगेच डीआरएसचा इशारा दिला. चेंडू आधी बॅटला आणि नंतर पॅडला लागला, असा शाकिबचा समज होता. पण ज्या वेळी बॅटला चेंडू लागला, त्यावेळी बॅटही जमिनीला स्पर्श करत होती. टीव्ही अंपायरनं बराच वेळ रिप्ले पाहिला आणि स्निकोमीटरचीही मदत घेतली. थर्ड अंपायरनं सांगितलं की, चेंडू बॅटला लागला नाही तर बॅट जमिनीवर आदळल्यानं स्निकोमीटरमध्ये स्पाइक आला. यामुळे शाकिबला आऊट देण्यात आलं. परंतु तो चेंडू आणि बॅटचा स्पर्श झाल्याच्या दाव्यावर ठाम होता. या निर्णयामुळे शाकिबची मैदानावरील पंचांशी बाचाबाची झाली.

विराट कोहलीचं खोटं क्षेत्ररक्षण
2022 च्या विश्वचषक स्पर्धेत भारत विरुद्ध बांगलादेश सुपर-12 टप्प्यातील सामना खेळला जात होता. या सामन्यात भारतीय संघानं 5 धावांनी विजय मिळवला. ही घटना बांगलादेशच्या डावातील 7 व्या षटकात घडली. लिटन दासनं चेंडू ऑफ साइडच्या दिशेनं खेळला. अर्शदीप सिंग स्क्वेअर पोझिशनमध्ये खूप दूर उभा होता. चेंडू अर्शदीपकडे जात होता, पण पॉइंट पोझिशनवर उभ्या असलेल्या विराट कोहलीनं त्याच्या हातात चेंडू न घेता चेंडू फेकण्याचा इशारा केला. सामना संपल्यानंतर बांगलादेशी खेळाडू नुरुल हसन म्हणाला की, जर मैदानातील पंचांनी कोहलीची ही कृती पाहिली असती तर त्यांना 5 अतिरिक्त धावा मिळायला हव्या होत्या.

विराट कोहलीचा नो बॉल वाद
टी20 विश्वचषक स्पर्धेत भारतानं पाकिस्तानचा रोमहर्षक सामन्यात 4 गडी राखून पराभव केला. भारताचा डाव 20 व्या षटकापर्यंत पोहोचला होता आणि शेवटच्या 3 चेंडूत संघाला 13 धावांची गरज होती. दरम्यान, मोहम्मद नवाजनं फुल टॉस बॉल टाकला, ज्यावर कोहलीनं षटकार ठोकला. पुढच्याच क्षणी कोहलीनं कमरेच्या वर ‘नो बॉल’ची मागणी केली. यानंतर पंचांनी ‘नो बॉल’ घोषित केला. यावरून पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमची पंचाशी वादावादी झाली. पण रिव्ह्यू घेण्यात आला नाही. चेंडूची उंची पाहता तो कोहलीच्या कमरेच्या वर आहे हे स्पष्टपणे समजत नव्हतं. विराट क्रीजच्या बाहेर गेला असल्यानंही शंकेला कारण होतं. तो नो बॉल नव्हता असं पाकिस्तानी खेळाडू अजूनही मानतात.

शाकीब अल हसन पुन्हा पंचांशी भिडला
टी20 विश्वचषक 2022 मधील भारत विरुद्ध बांग्लादेश सामना पावसामुळे प्रभावित झाला होता. त्यामुळे षटकांची संख्या 16 करण्यात आली. टीम इंडियानं प्रथम फलंदाजी करताना 184 धावा केल्या होत्या. लक्ष्याचा पाठलाग करताना बांगलादेशनं पहिल्या 7 षटकात 66 धावा केल्या होत्या आणि डकवर्थ लुईस नियम लागू झाला तेव्हा बांगलादेश स्कोअरच्या 17 धावांनी पुढे असल्याचं दिसून आले. सुमारे तासाभरानंतर सामना सुरू झाला. मात्र बांगलादेशचा कर्णधार शाकीब अल हसन यानं मैदान अद्याप फलंदाजीसाठी सुरक्षित नसल्याचं मत व्यक्त केलं. या मुद्द्यावर त्यानं बराच वेळ पंचांशी वाद घातला. पण शेवटी त्याच्या संघाला मैदानात यावं लागलं. या सामन्यात बांगलादेशचा 5 धावांनी पराभव झाला.

दनुष्का गुणातिलकावर बलात्काराचा आरोप 
टी20 विश्वचषक 2022 दरम्यान श्रीलंकेचा क्रिकेटपटू दनुष्का गुणातिलका याच्यावर एका ऑस्ट्रेलियन महिलेनं तिच्या घरी जाऊन लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप केला होता. गुणातिलका याला यानंतर अटक करण्यात आली. 11 दिवस कारागृहात राहिल्यानंतर त्याची जामिनावर सुटका करण्यात आली.

महत्त्वाच्या बातम्या – 

सर्वांचा लाडका ‘डीके’ झाला 39 वर्षांचा! धोनीच्या सावलीत झाकोळली गेली अख्खी क्रिकेट कारकीर्द

मोठी बातमी! टी20 विश्वचषकापूर्वी इंग्लंड संघात खळबळ! स्टार क्रिकेटपटू सट्टेबाजीमुळे निलंबित

टी20 विश्वचषकापूर्वी सुरेश रैनानं दिली प्रतिक्रिया म्हणाला, “भारतीय संघाची जिंकण्याची…”

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---