क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ असल्याचे म्हटले जाते. कारण अनेकदा क्रिकेट सामन्यांमध्ये असे निकाल पहायला मिळाले आहेत, ज्याचे आश्चर्य वाटेल. शेवटच्या चेंडूपर्यंत आणि शेवटच्या विकेटपर्यंत क्रिकेटमध्ये निकालाबाबत अनिश्चितता असते.
पण बऱ्याचदा बलाढ्य आणि अनुभवी संघ त्यांच्यापेक्षा तुलनेने कमजोर संघांवर वर्चस्व गाजवताना दिसतात. त्यांचा विजय जवळपास गृहित धरला जातो. पण काहीवेळेस या बलाढ्य संघांना त्यांच्याच आत्मविश्वास नडतो आणि समोरचा संघ त्यांच्यावर मात करतो.
आत्तापर्यंत अनेकदा झाले आहे. विशेष म्हणजे विश्वचषकातही असे सामने झाले आहेत, ज्यात बलाढ्य संघांवर त्यांच्यापेक्षा कमजोर संघाने मात करत विजय मिळवला आहे. अशाच विश्वचषकातील ५ सामन्यांचा या लेखात आढावा घेण्यात आला आहे.
वनडे विश्वचषकात बलाढ्य संघांना भारी पडलेले ५ कमकुवत संघ –
५. झिम्बाब्वे विरुद्ध इंग्लंड, १९९२ विश्वचषक –
क्रिकेट हा इंग्लिश खेळ असल्याने सुरुवातीपासूनच इंग्लंड हा क्रिकेटमधील एक बलाढ्य संघ म्हणून प्रसिद्ध आहे. पण असे असले तरी त्यांना अनेकदा त्यांच्यापेक्षा कमजोर संघाकडून पराभवही स्विकारावा लागला आहे. त्यातील एक सामना म्हणजे १९९२ च्या विश्वचषकातील झिम्बाब्वेविरुद्धचा सामना. त्यावेळी झिम्बाब्वे हा इंग्लंडच्या मानाने तसा कमजोर संघ होता. पण साखळी फेरी दरम्यान या झिम्बाब्वे संघाने इंग्लंडला पराभवाची चव चाखायला लावली होती.
१८ मार्च १९९२ ला एल्बरी येथे झालेल्या सामन्यात इंग्लंडने झिम्बाब्वेला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले होते. त्यांचा हा निर्णय योग्यही ठरला होता. कारण झिम्बाब्वेचा संघ ४६.१ षटकात केवळ १३४ धावांवर सर्वबाद झाला होता. इंग्लंडकडून रिचर्ड इलिंगवर्थ आणि इयान बॉथमने प्रत्येकी ३ विकेट घेत महत्त्वपूर्ण कामगिरी केली होती. तर झिम्बाब्वेकडून कर्णधार डेव्ह ह्यूटनने सर्वाधिक २९ धावा केल्या होत्या आणि लेन बचार्टने २४ धावा केल्या होत्या. त्यांच्याव्यतिरिक्त कोणत्याही फलंदाजाला २० च्या पुढे धावा करता आल्या नव्हत्या.
त्यावेळी इंग्लंडचा विजय जवळजवळ पक्का होता असेच गृहित धरले जात होते. परंतू झिम्बाब्वे संघाने असा काही खेळ केला की अनेकजण चकीत झाले. झिम्बाब्वे संघाने ४९.१ षटकार इंग्लंडचा डाव १२५ धावांवर संपुष्टात आणला आणि ९ धावांनी विजय मिळवला. झिम्बाब्वेकडून एड्डो ब्रॅंडेसने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या होत्या. इंग्लंडकडून यष्टीरक्षक फलंदाज ऍलेक स्टिवर्टने सर्वाधिक २९ धावा केल्या होत्या. तर त्याच्याव्यतिरिक्त निल फेअरब्रदरला २० धावा करण्यात यश आले होते. त्यांच्याव्यतिरिक्त कोणीही २० धावांच्या पुढे धावा करु शकले नव्हते.
विशेष म्हणजे झिम्बाब्वेचा हा केवळ दुसरा वनडे विजय होता.
४. केनिया विरुद्ध वेस्ट इंडिज, १९९६ विश्वचषक
१९९६ चा विश्वचषक भारतात झाला होता. त्या विश्वचषकात बलाढ्य वेस्ट इंडिज संघाविरुद्ध केनिया सारख्या संघाने विजय मिळवल्याने अनेकांना आश्चर्य वाटले होते. हा सामना २९ फेब्रुवारी १९९९ ला पुण्याच्या नेहरु स्टेडियमवर झाला होता.
या सामन्यात केनिया संघाने प्रथम फलंदाजी केली होता. त्यांनी प्रथम फलंदाजी करताना ४९.३ षटकात सर्वबाद १६६ धावा केल्या होत्या. त्यांच्याकडून स्टिव्ह टिकोलोने सर्वाधिक २९ धावा केल्या होत्या. तर वेस्ट इंडिजकडून गोलंदाजी करताना कर्टनी वॉल्श आणि रॉजर हार्परने प्रत्येकी ३ विकेट्स घेतल्या होत्या.
पण यानंतर केनियाच्या गोलंदाजांनी सर्वांना तोडांत बोटे घालायला लावली. कारण वेस्ट इंडिजचा संघ त्यांच्यासमोर केवळ ९३ धावांवर सर्वबाद झाला. वेस्ट इंडिजकडून केवळ शिवनारायण चंद्रपॉल(१९) आणि रॉजर हार्पर(१७) यांनाच दोन आकडी धावसंख्या पार करता आली. केनियाकडून राजब अली आणि मावरिस ओडुम्बेने प्रत्येकी ३ विकेट्स घेत केनियाच्या विजयात महत्त्वाचा वाटा उचलला.
३. बांगलादेश विरुद्ध पाकिस्तान, १९९९ विश्वचषक
९० च्या दशकातील पाकिस्तानच्या संघाला पराभूत करणे सोपे नव्हते. पण हा कारनामा १९९९ च्या विश्वचषकात बांगलादेशने करुन दाखवला होता. नॉर्थम्पटन येथे ३१ मे १९९९ ला बांगलादेश विरुद्ध पाकिस्तान संघात विश्वचषकाच्या साखळी फेरीतील सामना झाला होता. त्या सामन्याआधी पाकिस्तानने सर्व ४ सामने जिंकले होते. तर बांगलादेशला केवळ स्कॉटलँड विरुद्ध विजय मिळवता आला होता.
पण या सामन्यात पाकिस्तानने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. बांगलादेशने प्रथम फलंदाजी करताना ५० षटकात ९ बाद २२३ धावा केल्या होत्या आणि पाकिस्तानला २२४ धावांचे आव्हान दिले होते. बांगलादेशकडून अक्रम खान(४२) आणि शहरीयार हुसेनने(३९) महत्त्वपूर्ण खेळी केली होती. तर पाकिस्तानकडून सक्लेन मुश्ताक यांनी ५ विकेट्स घेतल्या होत्या.
त्यानंतर २२४ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानने पहिल्या ५ विकेट्स केवळ ४२ धावांमध्ये गमावल्या. त्यामुळे त्यांच्यावरिल दबाव वाढला होता. तरी पाकिस्तानच्या तळातल्या फळीने थोडाफार प्रतिकार केला. परंतू पाकिस्तानचा संघ बांगलादेशच्या गोलंदाजीपुढे अपयशी ठरला. त्यांचा डाव ४४.३ षटकात १६१ धावांवर संपुष्टात आला. त्यामुळे बांगलादेशने ६२ धावांनी विजय मिळवला.
हा बांगलादेशचा केवळ तिसरा वनडे विजय होता. बांगलादेशकडून खालीद मेहमूदने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या होत्या. तर अन्य ४ गोलंदाजांनी प्रत्येकी १ विकेट घेतली होती. पाकिस्तानकडून अझर मेहमूद आणि कर्णधार वासिम आक्रमने प्रत्येकी २९ धावा केल्या होत्या. ही पाकिस्तानच्या डावातील सर्वोत्तम धावसंख्या होती.
२. केनिया विरुद्ध श्रीलंका २००३ विश्वचषक –
२००० च्या दशकाच्या आसपास श्रीलंकेचा संघ एक बलाढ्य संघ म्हणून सर्वांसमोर आला होता. पण त्याच काळात त्यांना त्यांच्यापेक्षा तुलनेने कमजोर असणारा संघ केनियाविरुद्ध पराभव स्विकारावा लागला होता. हा पराभव त्यांना २००३ च्या विश्वचषकात स्विकारावा लागला होता.
२४ फेब्रुवारी २००३ ला झालेल्या या सामन्यात केनियाने प्रथम फलंदाजी केली होती. त्यांच्याकडून सलामीवीर केनेडी ओटिएनोने महत्त्वपूर्ण ६० धावांची खेळी केली. मात्र त्याच्याव्यतिरिक्त अन्य फलंदाजांना खास काही करता आले नव्हते. पण श्रीलंकेने त्या सामन्यात तब्बल २८ धावा ज्यादाच्या दिल्याने केनियाला फायदा झाला.
केनियाने प्रथम फलंदाजी करताना ९ बाद २१० धावा केल्या. श्रीलंकेकडून मुथय्या मुरलीधरनने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या. तर चामिंडा वासने ३ विकेट्स घेतल्या होत्या.
त्यानंतर फलंदाजी करण्यासाठी उतरलेल्या श्रीलंकेने नियमित अंतराने केनियाच्या गोलंदाजांसमोर विकेट्स गमवायला सुरुवात केली. श्रीलंकेकडून केवळ अरविंद डि सिल्वाने ४१ धावांची एकाकी झुंज दिली. मात्र बाकी फलंदाज मोठ्या धावा करण्यात अपयशी ठरले. त्यामुळे श्रीलंकेचा डाव ४५ षटकात १५७ धावांवर संपुष्टात आला आणि केनियाने हा सामना ५३ धावांनी जिंकत सर्वांना चकित केले. केनियाकडून कॉलिन ओबुयाने सर्वाधिक ५ विकेट्स घेतल्या होत्या.
१. आयर्लंड विरुद्ध इंग्लंड, २०११ विश्वचषक
२०११ च्या विश्वचषकात आयर्लंडने इंग्लंडसारख्या बलाढ्य संघाला पराभूत करत अनेकांना आश्चर्यचकित केले होते. या दोन संघात २ मार्च २०११ ला बंगळुरुच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर हा सामना झाला होता. या सामन्यात इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना ३२७ धावांचा डोंगर उभा केला होता.
इंग्लंडकडून जोनाथन ट्रॉट(९२), इयान बेल(८१) आणि केविन पीटरसन(५९) या तिघांनीही अर्धशतके झळकावली होती. तर आयर्लंडकडून जॉन मुनीने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या होत्या.
त्यावेळी ३२७ ही मोठी धावसंख्य असल्याने इंग्लंडच्या विजय पक्का असल्याने मानले जात होते. परंतू आयर्लंडच्या फलंदाजांनी चांगली सुरुवात केली. पण सुरुवातीच्या चांगल्या भागीदारीनंतर आयर्लंडने १११ धावांत ५ विकेट्स गमावल्या होत्या.
पण असे असले तरी ५ व्या क्रमांकावर फंलदाजी करण्यासाठी आलेल्या केविन ओब्रायनने झंझावती खेळी केली. त्याने केवळ ६३ चेंडूत ११३ धावांची खेळी केली. या खेळीत त्याने १३ चौकार आणि ६ षटकार मारले. त्याला अॅलेक्स कसाक(४७) आणि जॉन मुनीने(३३) चांगली साथ दिली. त्यामुळे आयर्लंडने ३२७ धावांचे आव्हान ४९.१ षटकात ७ विकेट्स गमावत सहज पार केले आणि विजय साकार केला.
वाचनीय लेख –
दारुमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकलेले ५ क्रिकेटपटू, टीममधून गमवावी लागली होती जागा
क्रिकेटमधील ५ असे अंपायर, जे कायमच चाहत्यांचे राहिले खास
वनडेमध्ये ५ हजार धावा आणि शंभर बळी घेणारे ३ भारतीय क्रिकेटपटू, एक आहे युवराज तर..