क्रिकेटमध्ये संघ जिंकल्यानंतर किंवा वैयक्तिकरित्या एखादा मोठा टप्पा पार केल्यानंतर अनेकदा खेळाडू जोरदार सेलिब्रेशन करताना दिसतात. पण काहीवेळा अशाही घटना घडल्या आहेत, जिथे काही खेळाडूंनी विजय मिळवण्याच्या आधीच सेलिब्रेश केले आणि नेमका त्यांना पराभव स्विकारावा लागला किंवा विजय मिळवण्याआधीच सेलिब्रेशन केल्याने त्यांच्यावर टिका झाली. तर काही खेळाडूंनी वैयक्तिरित्या महत्त्वाचा टप्पा पार करण्याआधीच सेलिब्रेशन केले. या लेखात अशाच 5 घटनांचा आढावा घेतला आहे.
विजय मिळवण्याआधी किंवा वैयक्तिक यश मिळवण्याआधी खेळाडूंनी सेलिब्रेशन केल्याच्या 5 घटना(5 instances when cricketers exhibited premature excitement at team or individual milestones.) –
1. आर अश्विन (सय्यद मुश्ताक अली टी20 ट्रॉफी अंतिम सामना) –
सय्यद मुश्ताक अली टी20 ट्रॉफी 2019 चा अंतिम सामना कर्नाटक विरुद्ध तमिळनाडू संघात पार पडला. शेवटच्या चेंडूपर्यंत रोमांचकारी झालेल्या या सामन्यात कर्नाटकने 1 धावेने विजय मिळवून स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. पण तमिळनाडूचा फिरकीपटू आर अश्विनने सामना संपण्याआधीच केलेल्या सेलिब्रेशनमुळे हा सामना चर्चेत आला होता.
या सामन्यात कर्नाटकने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 5 बाद 180 धावा केल्या आणि तमिळनाडूला विजयासाठी 181 धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना तमिळनाडूला विजयासाठी शेवटच्या षटकात 13 धावांची गरज होती. हे षटक कर्नाटककडून कृष्णप्पा गॉथमने टाकले.
त्याच्या गोलंदाजीवर या षटकातील पहिल्या 2 चेंडूवर आर अश्विनने 2 चौकार ठोकत त्याचे इरादे स्पष्ट केले होते. पण याबरोबरच त्याने 2 चौकार मारत जोरदार सेलिब्रेशनही केले होते. त्यानंतर मात्र तिसऱ्या चेंडूवर एकही धाव निघाली नाही.
चौथ्या चेंडूवर अश्विनने 1 धाव काढली आणि विजय शंकर फलंदाजीसाठी स्ट्राईकवर आला. पण पाचव्या चेंडूवर 1 धाव पूर्ण केल्यानंतर दुसरी धाव घेताना शंकर धावबाद झाला. त्यामुळे मुरुगन अश्विन हा नवीन फलंदाज शेवटचा चेंडू खेळण्यासाठी स्ट्राईकवर आला. त्यावेळी तमिळनाडूला विजयासाठी 1 चेंडूत 3 धावांची गरज होती. पण त्यांना एकच धाव घेता आली आणि कर्नाटकने 1 धावेने विजय मिळवला.
Here is the drama of last over…. pic.twitter.com/JXqt19TrE9
— Aarenn (@KarnatakaCrickt) December 1, 2019
2. हर्षेल गिब्स (1999 विश्वचषक विरुद्ध ऑस्ट्रेलिया) –
1999 ला झालेल्या विश्वचषकात सुपर सिक्स फेरीतील ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात निर्णायक सामना झाला होता. या सामन्यात ऑस्ट्रेलियासमोर विजय मिळून उपांत्य फेरीत प्रवेश करण्यासाठी 271 धावांचे आव्हान होते.
या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाची अवस्था ३ बाद ४८ धावा अशी बिकट होती. त्यावेळी ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टिव्ह वॉ फलंदाजीला आला. वॉ ५६ धावांवर असताना एक सोपा झेल मिड-विकेटला उभ्या असणाऱ्या गिब्सने सोडला आणि वॉला जीवदान मिळाले.
झाले असे की तो झेल आधी गिब्सने पकडला होता. पण तो घाईत असल्याने त्याचा तोल सांभाळता आला नाही आणि चेंडू त्याच्या हातातून निसटला. त्या जीवदानाचा फायदा घेत वॉने शतक करत ऑस्ट्रेलियाला विजयही मिळवून दिला.
3. मुशफिकूर रहिम (टी20 विश्वचषक 2016 विरुद्ध भारत)
-2016 टी20 विश्वचषकात भारत विरुद्ध बांगलादेश संघात निर्णायक सामना झाला होता. या सामन्यात भारताने 1 धावेने विजय होता. पण हा सामना संपण्याआधीच मुशफिकूर रहिमने बांगलादेश सामना जिंकणार म्हणून जोरदार सेलिब्रेशन केले होते. ज्याबद्दल त्याला नंतर सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आले होते.
झाले असे की बांगलादेशला हा सामना जिंकण्यासाठी शेवटच्या षटकात 11 धावांची गरज होती आणि भारताकडून हे षटक हार्दिक पंड्या टाकत होता. बांगलादेशकडून या षटकाच्या पहिल्या चेंडूवर महमुद्दुलाहने 1 धाव घेतली. त्यामुळे फलंदाजीसाठी रहीम स्ट्राईकवर आला. त्याने पुढच्या 2 चेंडूवर 2 चौकार ठोकले आणि सेलिब्रेशन केले.
त्यावेळी बांगलादेशला 3 चेंडूत 2 धावांची गरज होती. पण उत्साहाच्या भरात मोठा फटका खेेळताना रहिम झेलबाद झाला. त्याच्या पुढच्याच चेंडूवर महमुद्दुलाह देखील झेलबाद झाला. तर शेवटच्या चेंडूव 2 धावांची गरज असताना मुस्तफिजूर रेहमान धावबाद झाला आणि भारतीय संघाने 1 धावेने विजय मिळवला.
4. सुरेश रैना (आयपीएल 2009 राजस्थान रॉयल्स विरुद्ध)
2009 मध्ये चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स संघात झालेल्या सामन्यात रैना 98 धावेवर बाद झाला होता. पण त्यावेळी त्याने शतक झाल्याचे वाटून आधीच सेलिब्रेशन केले होते. त्यावेळी आयपीएलमध्ये कोणत्याच भारतीय खेळाडूने शतक केले नव्हते. त्यामुळे रैनाला आयपीएलमध्ये शतक करणारा पहिला भारतीय खेळाडू होण्याची संधी होती.
रैनाने 94 धावांवर खेळत असताना एक सुरेख फटका मारला. त्यावेळी चेंडू षटकार गेल्याचे वाटल्याने त्याने शतक पूर्ण झाल्याचे समजून सेलिब्रेशन केले. पण पंचांनी तो चेंडू चौकार गेला असल्याचा इशारा केला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्याच्या पुढच्याच चेंडूवर रैना 98 धावांवर मुनाफ पटेलच्या गोलंदाजीवर बाद झाला.
5. असेला गुनरत्ने – तिसरा टी20 सामना विरुद्ध दक्षिण आफ्रिका, 2017
2017 ला श्रीलंका दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर गेली होती. त्यावेळी टी20 मालिकातील तिसरा सामना केपटाऊनला झाला होता. या सामन्यात श्रीलंकेला विजयासाठी शेवटच्या षटकात 11 धावांची गरज होती. त्यावेळी पहिल्या चेंडूवर गुनरत्नेने चौकार मारला. त्याच्या पुढच्या 2 चेंडूवर 2 धावा निघाल्या.
त्यामुळे श्रीलंकेला विजयासाठी शेवटच्या 3 चेंडूत 5 धावांची गरज होती. तेव्हा गुनरत्नेने चौथ्या चेंडूवर चौकार मारला. त्यावेळी त्याला वाटले श्रीलंका सामना जिंकण्याबरोबरच मालिकाही जिंकली म्हणून त्याने आनंदाने स्टंप उघडून हातात घेतला. पण त्याला त्याचा साथीदार फलंदाज प्रसन्नाने अजून 2 चेंडूत 1 धावेची गरज असल्याचे सांगितले.
गुनरत्नेने पुढच्याच चेंडूवर ती 1 धाव पूर्ण केली आणि श्रीलंकेचा विजय निश्चित केला. पण तरीही विजय मिळवण्याच्या आधीच गुनरत्नेने केलेल्या सेलिब्रेशनची चर्चा मोठ्या प्रमाणात झाली.
ट्रेंडिंग घडामोडी –
रविंद्र जडेजाच्या आधी या खेळाडूला संघसहाकरी म्हणायचे सर
टीममध्ये निवड न झाल्यामुळे रात्रभर रडला होता विराट, या व्यक्तीला विचारली होती कारणं
असे ३ वनडे सामने, जिथं गांगुली स्लो खेळला आणि टीम इंडियाला पराभव पहावा लागला