क्रिकेट हा सांघिक खेळ आहे. क्रिकेटमधील अधिकाधिक विजय मुख्यत्वे सांघिक कामगिरीच्या बळावर मिळवले जातात. परंतु, कधीकधी काही खेळाडू संघापेक्षा वैयक्तिक कामगिरीवर लक्ष देतात. स्वार्थीपणामुळे वैयक्तिक विक्रमांसाठी हे खेळाडू खेळताना दिसतात. अशाच पाच महान खेळाडूंविषयी जाणून घेऊया जे कधीतरी स्वार्थी होऊन खेळले.
१) सचिन तेंडुलकर
२००४ मध्ये पाकिस्तानविरुद्ध मुलतानमध्ये खेळला गेलेला कसोटी सामना सर्वांना आठवत असेल. ज्यामध्ये सेहवागने तिहेरी शतक झळकावले होते. भारतीय संघाच्या वतीने हे पहिलेच त्रिशतक होते. सेहवाग ३०९ धावांवर बाद झाला होता. त्यानंतर, सचिन तेंडुलकर १९४ धावांवर खेळत असताना कर्णधार राहुल द्रविडने डाव घोषित केला. द्विशतक ठोकता न आल्याबद्दल सचिन खूप नाराज झाला होता. सचिन तेंडुलकर आयुष्यभर संघासाठी खेळत राहिला, परंतु या सामन्यामुळे त्याच्यावर स्वार्थीपणाचा शिक्का मारला गेला. याच्या उलट बाजूला असाच काहीसा शिक्का याच सामन्यासाठी राहुल द्रविडवर मारला गेला.
२) सुनील गावसकर
पहिल्या विश्वचषकाच्या पहिल्याच सामन्यात, इंग्लंडच्या ३३४ धावांचा पाठलाग करताना, महान फलंदाज सुनील गावसकर यांनी देखील एक स्वार्थी खेळी केली होती. गावसकर इतके हळू फलंदाजी करत होते की, ज्यामुळे ते भारतीय संघाला विजय मिळवून देण्यासाठी खेळत नसल्याचे दिसून आले. गावसकर यांनी पूर्ण ६० षटके फलंदाजी करत १७४ चेंडूंचा सामना करून अवघ्या ३६ धावा बनविल्या होत्या.
३) ट्रेव्हर चॅपेल
ही घटना क्रिकेटची अतिशय वाईट घटना म्हणून ओळखली जाते. १ फेब्रुवारी १९८१ रोजी झालेल्या न्यूझीलंड विरुद्ध ऑस्ट्रेलियाच्या सामन्यात न्यूझीलंडला विजयासाठी एका चेंडूत ७ धावांची आवश्यकता होती. कर्णधार ग्रेग चॅपेलने गोलंदाज, आपला भाऊ ट्रेव्हर याला तो चेंडू अंडरआर्म टाकण्यास सांगितले. त्यावेळी, गोलंदाजीबाबत काही नियम नसल्याने तो चेंडू ग्राह्य धरला गेला. पण, अजूनही ती घटना क्रिकेट इतिहासातील सर्वात वाईट घटना म्हणून आठवली जाते.
४) सचिन तेंडुलकर
क्रिकेटचा देव म्हणून ओळखला जाणारा सचिन तेंडुलकर १०० वे शतक झळकावताना अतिशय हळुवार खेळला होता. सचिनच्या या विश्वविक्रमी शतकाकडे लाखो लोकांचे लक्ष लागून राहिले होते आणि त्याने बांगलादेशविरूद्ध हे शतक पूर्ण केले. मात्र, यासाठी सचिनने १३८ चेंडू घेतले होते. याचा परिणाम असा झाला की, भारत ५० षटकांत केवळ २८९ धावा करू शकला. पुढे, बांगलादेशने या सामन्यात भारताला पाच गडी राखून धूळ चारली.
५) जॅक कॅलिस
२००७ च्या विश्वचषकात ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामन्यात ऑस्ट्रेलियाने ३३७ धावांची मोठी धावसंख्या रचली. यानंतर द. आफ्रिकेनेही वेगवान सुरुवात करत पहिल्या २० षटकांत १६० धावा केल्या, परंतु त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीस आलेल्या कॅलिसने अतिशय संथ फलंदाजी केली. त्याने ७३ चेंडूंत केवळ ४८ धावा केल्या. कदाचित, याचाच परिणाम असा झाला की सुरुवातीला सामना जिंकताना दिसणारा आफ्रिका नंतर हा सामना ८३ धावांनी हरला.