भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिला सामना कानपूरच्या ग्रीन प्रार्क स्टेडियमवर गुरुवारपासून (२५ नोव्हेंबर) खेळला जात आहे. सामना अंतिम टप्प्यात आला असून, रोमांचक बनला आहे. सामन्याच्या दुसऱ्या डावात न्यूझीलंड संघाला भारताने २८४ धावांचे आव्हान दिले आहे. सामन्याच चौथ्या दिवसाचा खेळ संपण्यापूर्वी न्यूझीलंड संघाला फलंदाजीची संधी मिळाली. मात्र, त्यांचा सलामीवीर विल यंग दुर्दैवाने बाद झाला. यंग स्वतःचा विकेट वाचवू शकत होता, पण त्याने आपल्या चुकीमुळे विकेट गमावला.
पहिल्या कसोटीच्या चौथ्या दिवशी न्यूझीलंड संघाला फलंदाजीची संधी मिळाली. मात्र, न्यूझीलंड संघ चौथ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत फक्त चार षटकांचा सामना करू शकला. या चार षटकात देखील न्यूझीलंड संघाला एक मोठा झटका मिळाला. संघाची धावसंख्या तीन असताना सलामीवीर विल यंग तंबूत परतला. यंगने डावातील तिसऱ्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर विकेट गमावला. यावेळी फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विन गोलंदाजी करत होता.
यंग अश्विनच्या षटकातील शेवटच्या चेंडूवर पायचित झाला. चेंडू पायाला लागल्यानंतर यंगकडे डीआरएस घेण्याची संधी होती. मात्र, त्याआधी त्याने खेळपट्टीवरील त्याचा सहकारी टॉम लॅथमचा सल्ला घेतला. त्यानंतर पंचांना डीआरएस घेण्याचा इशारा करेपर्यंत उशीर झाला होता. डीआरएस घेण्यासाठी १५ सेकंदाच्या आधी फलंदाजाला निर्णय घ्यायचा असतो. मात्र, यंगला हा निर्णय घेण्यासाठी अवघ्या एका सेकंदाचा उशीर झाला. त्यामुळे त्याला डीआरएस घेता आला नाही आणि तो पवेलियनकडे परतला.
यंगने डीआरएस घेण्याची संधी गमावली असली तरी, तर तो मैदानाबाहेर गेल्यावर जेव्हा रिप्ले पाहिला गेला, तेव्हा तो बाद नसल्याचे समोर आले. यंगने जर डीआरएस घेण्यासाठी एक सेकंद आधी इशारा केला असता, तर त्याला जीवनदान मिळाले असते.
दरम्यान, सामन्याच्या सुरुवातील भारताने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या डावाता भारतने ३४५ धावा केल्या. प्रत्युत्तरात, न्यूझीलंडने २९६ धावा केल्या आणि संघ सर्वबाद झाला. भारतीय संघ पहिल्या डावात ४९ धावांनी आघाडीवर होता. त्यानंतर दुसऱ्या डावात भारताने ७ बाद २३४ धावा केल्या आणि डाव घोषीत केला. चौथ्या दिवसाचा शेवट होण्यापूर्वी न्यूझीलंड संघाने चार धावा केल्या आणि एक महत्वाचा विकेट गमावला.
भारतासाठी या सामन्यातून कसोटी पदार्पण करणाऱ्या श्रेयस अय्यरने जबरदस्त खेळी केली. त्याने पहिल्या डावात १०५ आणि दुसऱ्या डावात ६५ धावा केल्या. तसेच भारताचा फिरकी गोलंदाज अक्षर पटेलनेही पहिल्या डावात पाच विकेट्स घेत न्यूझीलंडला मर्यादित धावसंख्येवर रोखले.