भारतीय वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला (Mohmmed Shami) पुन्हा एकदा भारतीय संघात स्थान मिळाले नाही. रविवारी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) न्यूझीलंडविरुद्ध 11 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या 3 सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली. 2026 च्या पहिल्या मालिकेत शमीला संधी मिळेल अशी चाहत्यांना आशा होती, पण तसे झाले नाही.
घरगुती क्रिकेटमध्ये सातत्याने चांगली कामगिरी करूनही शमीला डावलले जाणे, हे एक प्रकारचे संकेत मानले जात आहेत. बीसीसीआय आता शमीच्या पलीकडे विचार करत असल्याचे दिसत असून, कदाचित हीच त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीची समाप्ती असू शकते. शमीची निवड न झाल्याने सोशल मीडियावर चाहते कमालीचे भावूक झाले आहेत.
शमीला संघात न पाहून चाहते सोशल मीडियावर आपल्या भावना व्यक्त करत आहेत. एका युजरने शमीचा फोटो शेअर करत लिहिले, आजच्या संघ निवडीवरून स्पष्ट होत आहे की, मोहम्मद शमीच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीचा कदाचित हा शेवट असू शकतो.
शमीने भारतासाठी आपला शेवटचा सामना 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये खेळला होता. विशेष म्हणजे, त्या संपूर्ण स्पर्धेत शमी भारतासाठी सर्वाधिक विकेट्स घेणारा (संयुक्तपणे) गोलंदाज होता. त्याने त्या स्पर्धेत 9 बळी घेतले होते.
महत्त्वाची गोष्ट म्हणजे, शमी सध्या बंगालकडून ‘विजय हजारे ट्रॉफी’ खेळत आहे. या 50 षटकांच्या स्पर्धेत शमीने 5 सामन्यांत 11 विकेट्स घेतल्या आहेत. त्याआधी ‘सैयद मुश्ताक अली ट्रॉफी’मध्ये त्याने 7 सामन्यांत 16 विकेट्स पटकावल्या होत्या, तर रणजी ट्रॉफीमध्येही त्याने अप्रतिम गोलंदाजी केली होती. इतकी शानदार कामगिरी करूनही त्याला संधी न मिळणे, हे त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे ठरत आहे.






