मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने जेव्हा कसोटी पदार्पण केले होते त्याच सामन्यात आणखी एका खेळाडूने भारताकडून कसोटी पदार्पण केले होते. परंतु पदार्पणानंतर सचिनने तब्बल २०० कसोटी सामने खेळले तर या खेळाडूला एकच कसोटी सामना खेळता आला.
या खेळाडूचे नाव सलील अंकोला असून तो आज त्याचा ५० वा वाढदिवस साजरा करत आहे. त्याने १५ नोव्हेंबर १९८९ ला पाकिस्तान विरुद्ध पदार्पण केले होते. त्याने या सामन्यात ६ धावा केल्या होत्या आणि २ विकेट्स घेतल्या होत्या.
तसेच सलिलने भारताकडून २० वनडे सामने खेळले आहेत. यात त्याने ४७.३० च्या सरासरीने १३ विकेट्स घेतल्या आहेत. त्याचा १९९६ मध्ये झालेल्या विश्वचषकातही समावेश होता. त्यानंतर त्याने १९९७ मध्ये २८ वर्षांचा असतानाच अभिनय क्षेत्रात जाण्यासाठी क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली.
यानंतर त्याने टीव्ही मालिकेमध्ये काम करायला सुरुवात केली. त्याची ‘शss कोई हैं’ तसेच ‘विक्राल और गब्राल’ मधील विक्रालची भूमीका चांगली गाजली होती. तसेच त्याने काही चित्रपटातही काम केले. यात कुरुक्षेत्र, पिताह, चुरा लिया हैं तुमने, असे काही चित्रपटात त्याने भूमिका साकारल्या.






