भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यात गुवाहाटी येथे तिसरा टी-20 सामना खेळवला जात आहे. या सामन्याद्वारे रवी बिश्नोईने (Ravi bishnoi) जवळपास एका वर्षानंतर संघात पुनरागमन केले. मैदानात उतरताच त्याने आपल्या गोलंदाजीने न्यूझीलंडच्या फलंदाजीची दाणादाण उडवली आणि आपला पुनरागमनाचा सामना अविस्मरणीय ठरवला. नाणेफेक जिंकून सूर्यकुमार यादवने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता, जो बिश्नोईने सार्थ ठरवला.
जवळपास 357 दिवसांनंतर रवी बिश्नोईला टीम इंडियाच्या जर्सीत खेळण्याची संधी मिळाली. वॉशिंग्टन सुंदर दुखापतग्रस्त झाल्यामुळे त्याला संघात स्थान मिळाले होते. सुरुवातीच्या दोन सामन्यांत संधी न मिळाल्यानंतर, तिसऱ्या सामन्यात वरुण चक्रवर्तीला विश्रांती देण्यात आली आणि बिश्नोई मैदानात उतरला. बिश्नोईची फिरकी कीवी फलंदाजांसाठी एक कोडेच ठरली. त्याने आपल्या 4 षटकांच्या कोट्यात अवघ्या 18 धावा देऊन 2 मोठे बळी टिपले. त्याने सेट झालेले फलंदाज ग्लेन फिलिप्स (48 धावा) आणि मार्क चॅपमन (32 धावा) यांना तंबूत धाडून न्यूझीलंडच्या धावसंख्येला ब्रेक लावला.
रवी बिश्नोई केवळ एक चांगला गोलंदाज नाही, तर एक चपळ क्षेत्ररक्षक देखील आहे. त्याने रचिन रवींद्रचा एक जबरदस्त झेल टिपला आणि बाउंड्री जवळ धावचीत रोखत काही महत्त्वाच्या धावा वाचवल्या. बिश्नोईच्या या अष्टपैलू कामगिरीमुळे न्यूझीलंडचा संघ 20 षटकांत 9 बाद फक्त 153 धावा करू शकला.






