भारतीय कर्णधार विराट कोहलीचे चाहते त्याच्या मोठ्या खेळीची बऱ्याच काळापासून वाट पाहत आहेत. पण विराटची बॅट अजून तरी शांतच राहिली आहे. सध्याच्या इंग्लंड दौऱ्यावर विराट कोहलीला अजून गती मिळवता आलेली नाही आणि या दौऱ्यावर खेळलेल्या तीन कसोटी सामन्यांमध्ये विराट फक्त एक अर्धशतक झळकावू शकला आहे. भारतीय कर्णधार इंग्लिश स्थितीत सतत अपयशी होत असल्याचे पाहून पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू आकिब जावेद यांनी त्याच्या फलंदाजीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.
विराटवर भाष्य करताना आकिब म्हणाले की, “तो एक सामान्य आशियाई फलंदाज आहे, जो ऑस्ट्रेलियामध्ये धावा करू शकतो. पण इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेतील स्विंगमुळे तो धावा करण्यासाठी खूप संघर्ष करतो.”
एका यूट्यूब चॅनेलवर बोलत असताना या माजी पाकिस्तानी क्रिकेटपटूने सांगितले की, “विराट कोहली हा एक सामान्य आशियाई खेळाडू आहे. तो ऑस्ट्रेलियामध्ये यशस्वी होऊ शकतो. पण, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकासारख्या ठिकाणी जिथे चेंडू खूप ‘स्विंग आणि सिम’ होतो, तिथे तो चेंडूला चेस करतो जे दाखवते की विराट ‘कंट्रोल आउट स्विंगर’ला किती खराब खेळतो.”
भारतीय कर्णधार विराट कोहलीने आपले शेवटचे आंतरराष्ट्रीय शतक नोव्हेंबर 2019 मध्ये बांगलादेशविरुद्धच्या मालिकेत केले होते. हे शतकही त्याने भारतातच केले होते. त्यानंतर विराटला एकही शतक करता आलेले नाही. कुठेतरी विराटच्या या खराब कामगिरीचा परिणाम आता भारतीय संघावरही दिसत आहे. कारण विराटशिवाय भारताची मधली फळी इंग्लिश गोलंदाजांसमोर असहाय्य दिसत आहे. जर उर्वरित दोन कसोटींमध्ये विराट कोहलीला पुन्हा गती मिळाली नाही; तर ही मालिका लवकरच भारताच्या आवाक्यापासून दूर जाऊ शकते.
आतापर्यंत इंग्लंड विरुद्ध भारत कसोटी मालिकेतील ३ सामने पार पडले आहेत. त्यापैकी पहिला सामना अनिर्णीत राहिल्यानंतर उभय संघांनी प्रत्येकी १ सामना जिंकत मालिकेत बरोबरी साधली आहे. २ सप्टेंबरपासून केनिंग्टन ओव्हल येथे मालिकेतील चौथा कसोटी सामना होणार आहे.
महत्वाच्या बातम्या-
ओव्हल कसोटीत अश्विन आणि शार्दुलचे पुनरागमन? ‘अशी’ असू शकते भारताची संभाव्य प्लेइंग ११
ओमानविरुद्ध जयस्वालची ‘यशस्वी’ खेळी; मुंबईने ४ विकेट्सने जिंकला पहिला वनडे सामना
विरोधी संघाच्या दिग्गजाचा भारताला मदतीचा हात, फलंदाजी बळकट करण्यासाठी दिला ‘हा’ सल्ला