यूएई आणि ओमानमध्ये सुरू असलेली आयसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धा सध्या शेवटच्या टप्प्यात पोहोचली आहे. या स्पर्धेतील अंतिम सामना रविवारी (१४ नोव्हेंबर) पार पडणार आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड हे दोन्ही संघ आमने सामने येणार आहेत. हा सामना जिंकणाऱ्या संघाला इतिहास रचण्याची सुवर्णसंधी आहे. कारण दोन्ही संघांना अजूनपर्यंत एकदाही टी२० विश्वचषकाचे जेतेपद मिळवता आले नाहीये. या महत्त्वपूर्ण सामन्याच्या पूर्वसंध्येला ऑस्ट्रेलियाच्या कर्णधाराने मोठे वक्तव्य केले आहे.
ऑस्ट्रेलियाचा कर्णधार आरोन फिंच याने सामन्याच्या पूर्वसंध्येला म्हटले की, “हे अप्रत्यक्ष नाहीये, आम्ही ही स्पर्धा जिंकण्याचा प्रयत्न करण्यासाठी एक योजना घेऊन आलो आहोत. आम्हाला नेहमी अस जाणवलं आहे की आमचे खेळाडू ते करू शकतात. अनेकांनी स्पर्धा सुरू होण्यापूर्वी आम्हाला कमी लेखलं होत. परंतु आम्ही जे प्रदर्शन केले ते खरचं कौतुकास्पद आहे. सर्वांनी खरंच चांगली कामगिरी केली होती. आमचे खेळाडू अंतिम सामना खेळण्यासाठी तयार आहेत.”
वनडे विश्वचषक स्पर्धेत ऑस्ट्रेलिया संघाने विक्रमी ५ वेळेस जेतेपद पटकावले आहे. आता ऑस्ट्रेलिया संघाकडे टी-२० विश्वचषक स्पर्धा जिंकण्याची सुवर्णसंधी आहे. आरोन फिंचला विश्वास आहे की, त्याचा हा संघ रविवारी (१४ नोव्हेंबर) इतिहास बदलू शकतो. याबाबत बोलताना आरोन फिंच म्हणाला की, “होय, ही अशी गोष्ट आहे जी भूतकाळात आम्ही मिळवू शकलो नव्हतो. परंतु हे सत्य आहे की, आम्ही आता अंतिम सामन्यात आहोत. आम्हाला यात सुधारणा करण्याची संधी आहे.”
तसेच न्यूझीलंड संघाबाबत बोलताना आरोन फिंच म्हणाला की, “त्यांना कमी लेखता येणार नाही. त्यांच्याकडे भरपूर क्षमता, अनुभव आणि कौशल्य आहे. त्यामुळे जेव्हा न्यूझीलंड संघ पोहोचला, त्यावेळी आम्हाला जास्त आश्चर्य झाले नाही. त्यांच्या संघात प्रतिभावान खेळाडू आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून ते पावरप्लेच्या षटकांमध्ये चांगली गोलंदाजी करत आहेत.”
महत्त्वाच्या बातम्या-
गेल्या ६ हंगामात ‘हे’ होते टी२० विश्वचषकाचे फायनलिस्ट, जाणून घ्या कोणत्या संघाने कधी मारलीय बाजी
काय सांगता! राहुल द्रविडच्या जागी ‘या’ ठिकाणी झाली व्हीव्हीएस लक्ष्मणची मुख्य प्रशिक्षक म्हणून निवड