आयपीएल २०२१ स्पर्धा सध्या शेवटच्या टप्प्यात पोहोचली आहे. या स्पर्धेचा अंतिम सामना येत्या १५ ऑक्टोबर रोजी पार पडणार आहे. हा हंगाम झाल्यानंतर आगामी हंगामात सर्व संघांमध्ये मोठे उलटफेर पाहायला मिळणार आहेत. आयपीएल २०२२ स्पर्धेत २ नवीन संघांचा समावेश होणार आहे. तर खेळाडूंचा मेगा लिलाव देखील होईल. हा लिलाव होण्यापूर्वी ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू ब्रॅड हॉगने एबी डिविलियर्सबद्दल मोठे वक्तव्य केले आहे.
आरसीबीने एबीला करारमुक्त करावे
ब्रॅड हॉगच्या मते, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने एबी डिविलियर्सला रिलीज केले पाहिजे आणि लिलावात कमी किमतीत खरेदी केले पाहिजे. ट्विटर एका युजरने विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देत असताना ब्रॅड हॉगने ही प्रतिक्रीया दिली. त्या युजरने विचारले होते की, ‘विराट कोहली नंतर रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचे कर्णधारपद कोणाला दिले पाहिजे?’ याचे उत्तर देत ब्रॅड हॉग म्हणाला, ‘एबी डिविलियर्सला आपल्या भविष्याबद्दल काहीच माहीत नाही. त्यामुळे त्याच्यावर दीर्घकालीन गुंतवणूक करणे योग्य ठरणार नाही. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने त्याला रिलीज केले पाहिजे आणि लिलावात कमी किमतीत आपल्या संघात समाविष्ट केले पाहिजे. असे मुळीच नाहीये की, त्याच्याकडे खेळण्याची क्षमता नाही. परंतु, हे सर्व या गोष्टीवर निर्भर करते की, त्याला अजून किती काळ खेळायचं आहे.’
अशी राहिली आहे कारकीर्द
एबी डिविलियर्सने आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात आतापर्यंत एकूण १८४ सामने खेळले असून, ज्यामध्ये त्याने ३९.७ च्या सरासरीने ५१६२ धावा केल्या आहेत. यामध्ये ३ शतक आणि ४० अर्धशतकांचा समावेश आहे.तर आयपीएल २०२१ स्पर्धेत तो साजेशी कामगिरी करण्यात अपयशी ठरला आहे.
https://twitter.com/Brad_Hogg/status/1447741811309621252?t=Sw7_taa1EvYQuh1IQnCxvw&s=19
आरसीबीचा एलिमिनेटरमध्ये पराभव
या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना बेंगलोर संघाकडून कर्णधार विराट कोहलीने ३३ चेंडूंमध्ये सर्वाधिक ३९ धावांची खेळी केली होती. या खेळीदरम्यान त्याने ५ चौकार मारले होते. तर देवदत्त पडिक्कलने १८ चेंडूंमध्ये २१ धावांची खेळी केली होती. परंतु इतर कुठल्याही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. परिणामी, बेंगलोर संघाला २० षटकाअखेर अवघ्या १३८ धावा करण्यात यश आले.
या धावांचा पाठलाग करताना कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून शुबमन गिलने १८ चेंडूंमध्ये सर्वाधिक २९ धावांची खेळी केली. तर व्यंकटेश अय्यरने २६ आणि सुनील नरीनने २६ धावांचे योगदान दिले. शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स संघाने ४ गडी राखून विजय मिळवला.






