(3 मे) रोजी चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (CSK vs RCB) झालेल्या सामन्यात आरसीबीने 2 धावांनी विजय मिळवला. यादरम्यान ऑस्ट्रेलियाचा महान विकेटकीपर फलंदाज अॅडम गिलख्रिस्टने (Adam Gilchrist) आयपीएलमध्ये महेंद्रसिंग धोनीच्या (MS Dhoni) कर्णधारपदावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि त्याचे निर्णय चुकीचे मानले आहेत. शनिवारी खेळल्या गेलेल्या आयपीएल सामन्यात आरसीबीने प्रथम फलंदाजी करत 20 षटकांत 5 गडी बाद 213 धावा केल्या, ज्याच्या प्रत्युत्तरात सीएसकेचा संघ 20 षटकांत 5 गडी बाद 211 धावाच करू शकला. यासह, आरसीबीने हंगामातील आठवा विजय मिळवला आणि संघ प्लेऑफच्या अगदी जवळ पोहोचला आहे. तसेच, चेन्नई सुपर किंग्जला नवव्या पराभवाला सामोरे जावे लागले, ज्यामुळे त्यांची परिस्थिती आणखी बिकट झाली आहे.
खरंतर, आरसीबी संघ प्रथम फलंदाजी करत असताना 19व्या षटकात खलील अहमदने 33 धावा दिल्या तेव्हा सामन्याचे चित्र बदलले. 18व्या षटकापर्यंत आरसीबीची धावसंख्या 159/5 अशी होता. पण 19व्या षटकात खलील अहमदच्या चेंडूवर आरसीबीचा विस्फोटक फलंदाज रोमारियो शेफर्डने (Romario Shephard) 6, 6, 4, 6, N6, 0, 4 अशा धावा ठोकल्या. शेफर्डने खलीलच्या गोलंदाजीवर वर्चस्व गाजवत एकूण 33 धावा काढल्या. शेफर्डने 14 चेंडूत नाबाद 53 धावा केल्या.रोमारियो शेफर्डने 378.57च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करताना 4 चौकारांसह 6 खणखणीत षटकार मारले. शेफर्डने त्याच्या घातक फलंदाजीच्या जोरावर आरसीबीची धावसंख्या 213 धावांवर नेली. यादरम्यान 19वे षटक खलील अहमदला सोपवल्याबद्दल अॅडम गिलख्रिस्टने महेंद्रसिंग धोनीच्या कर्णधारपदावर टीका केली आहे. गिलख्रिस्टच्या मते, 19व्या षटकात खलील अहमदऐवजी अंशुल कंबोज किंवा रवींद्र जडेजा यांना चेंडू द्यायला हवा होता.
अॅडम गिलख्रिस्ट म्हणाला, “रणनीतिकदृष्ट्या, मला माहित नाही की मोठा फरक पडला असता की नाही, परंतु खलीलला पुन्हा गोलंदाजीमध्ये आणणे धोकादायक होते, कारण त्याने आधीच त्याच्या 2 षटकांमध्ये सुमारे 32 धावा दिल्या होत्या. कदाचित तो (धोनी) अंशुल कंबोजला गोलंदाजी करण्यासाठी पाठवू शकला असता. नूर अहमदने ज्या पद्धतीने गोलंदाजी केली, त्याला पाहता रवींद्र जडेजाला एक अतिरिक्त षटक टाकण्यासाठी संघात आणता आले असते.”
धोनीची निवृत्ती जवळ येत असतानाही त्याची रणनीती बदललेली नाही का? असा प्रश्न अॅडम गिलख्रिस्टने विचारला. तो म्हणाला, “तो (एमएस) कधीही उत्साहित होत नाही किंवा तो नाराज आहे असे स्पष्टपणे व्यक्त करत नाही. मला फक्त आश्चर्य वाटते की त्याचे मन अजूनही त्याच्यासाठी नेहमीप्रमाणेच हुशारीने काम करत आहे का? कारण तो त्याच्या कारकिर्दीच्या शेवटच्या जवळ येत आहे. या वर्षी असो किंवा पुढच्या वर्षी, काहीही असो. मी त्याच्या कर्णधारपदावर जास्त टीका करू इच्छित नाही कारण मला वाटते की काही खराब गोलंदाजीमुळे तो निराश झाला आहे.”