भारत विरुद्ध इंग्लंड संघात शुक्रवारपासून (१२ मार्च) पाच सामन्यांची टी२० मालिका सुरू झाली आहे. या मालिकेपुर्वी भारतीय फिरकीपटू वरुण चक्रवर्ती याला दोनवेळा यो-यो टेस्टमध्ये अपयशी ठरल्यामुळे संघातून वगळण्यात आले. यानंतर भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने खेळाडूंसाठी फिटनेस महत्त्वाची असल्याचे सांगत संताप व्यक्त केला होता. आता माजी भारतीय क्रिकेटपटू अजय जडेजाने या मुद्द्यामुळे कोहलीवर निशाणा साधला आहे.
क्रिकबजशी बोलताना जडेजा म्हणाला की, “क्रिकेटपटूची तंदुरुस्ती (फिटनेस) आणि शैली यामध्ये शैलीला अधिक महत्त्व आहे. कोणताही फलंदाज इतका तंदुरुस्त असावा की तो सामना संपल्यानंतरही नाबाद राहावा. हेच गोलंदाज इतका तंदुरुस्त असावा की त्याला सामन्यामध्ये ४ षटके गोलंदाजी करता यावी. चक्रवर्ती ४ षटके गोलंदाजी करण्याइतपत तंदुरुस्त आहे. तो शैलीच्या बाबतीतही इतर खेळाडूंच्या तुलनेत खूप पुढे आहे. मग निश्चितच त्याला इंग्लंडविरुद्ध संधी मिळायला पाहिजे होती.”
“कोहली नेहमी तंदुरुस्तीला प्रथम प्राधान्य देतो. परंतु मला ही गोष्ट अजिबात पटत नाही. जर तंदुरुस्तीच्या दृष्टीने पाहायचे झाले तर, कुणास ठाऊक कधी रोहित शर्मा किंवा रिषभ पंत फिटनेस टेस्टमध्ये अपयशी होतील. भारतीय संघाच्या मागील २५-३० वर्षांच्या इतिहासात डोकावून पाहिले तर कर्णधाराचा संघात धाक राहिला आहे. जर कर्णधार तंदुरुस्त असेल, तर संघातील खेळाडूही तसेच हवेत. कोहलीसाठी तंदुरुस्ती सर्वाधिक महत्त्वाची आहे आणि याच कारणामुळे चक्रवर्ती संघाबाहेर झाला आहे,” असे पुढे जडेजाने म्हटले.
“जर आज एमएस धोनी भारतीय टी२० संघाचा कर्णधार असता. तर त्याने टी२० विश्वचषकाच्या दृष्टीने विचार केला असता. संघासाठी चषक जिंकणे गरजेचे असल्याने त्याने चक्रवर्तीसारख्या खेळाडूला घरी जाऊन बोलवून आणले असते आणि त्याला खेळवले असते. परंतु कोहली असे करणार नाही. त्याने संघाचे नेतृत्त्वपद स्विकारल्यापासून नवीन पद्धतीचा अवलंब केला आहे. त्याच्यासाठी जुनी पद्धत बेकार आहे. म्हणून आज चक्रवर्तीला संघात जागा मिळाली नाही,” असे शेवटी बोलताना जडेजाने म्हटले.
महत्त्वाच्या बातम्या-