भारतातील प्रसिद्ध देशांतर्गत क्रिकेट स्पर्धा, विजय हजारे ट्रॉफी २०२१ चा आज (१४ मार्च) अंतिम सामना रंगणार आहे. अरुण जेटली स्टेडियम, दिल्ली येथे उत्तर प्रदेश विरुद्ध मुंबई यांच्यात हा सामना होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी ९ वाजता या सामन्याची सुरुवात होईल. हा सामना जिंकत मुंबईला चौथ्यांदा विजेतेपद पटकावण्याची संधी असेल. तर उत्तर प्रदेश दुसऱ्यांदा विजय हजारे ट्रॉफीवर नाव कोरले.
जबरदस्त फॉर्ममध्ये आहे मुंबई संघ
उत्तर प्रदेश संघापुढे मुंबईचा कर्णधार पृथ्वी शॉ याच्या फलंदाजीवर अकुंश लावण्याचे आव्हान असणार आहे. त्याच्या योगदानामुळे मुंबई संघाने या हंगामातील सर्व सामने जिंकले आहेत. त्याने उपांत्यपुर्व आणि उपांत्य फेरी सामन्यात संघाला एकहाती विजय मिळवून दिला होता. त्याच्याव्यतिरिक्त आदित्य तरे, शिवम दुबे, सरफराज खान यांनीही पूर्ण हंगामात दमदार प्रदर्शन केले आहे. गोलंदाजीमध्ये तुषार पांडे, धवल कुलकर्णी या वेगवान गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली आहे. तर प्रशांत सोलंकी, तनुष कोटिया आणि शम्स मुलानी या फिरकीपटूंच्या तिकडीनेही फलंदाजांना थकवून सोडले आहे.
उत्तर प्रदेशही आहे तगडा संघ
उत्तर प्रदेश संघाच्या फलंदाजी फळीवर नजर टाकायची झाली तर, समर्थ सिंगने वरच्या फळीत चमकदार कामगिरी केली आहे. कर्णधार कर्ण शर्माही संघासाठी उपयोगी फलंदाज ठरला आहे. यष्टीरक्षक फलंदाज उपेन्द्र सिंगने उपांत्यपुर्व आणि उपांत्य फेरी सामन्यात मोठेखानी खेळी करत संघाला विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका साकारली होती. गोलंदाजी विभागात शिवम मावी, यश दयाल यांनी सर्वांना प्रभावित केले आहे.
अशात मुंबई आणि उत्तर प्रदेश यांच्यात काट्याची टक्कर पाहायला मिळणे निश्चित आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
टीम इंडियाकडून पदार्पणास ‘हा’ खेळाडू सज्ज; म्हणाला, ‘कोणत्याही क्रमांकावर फलंदाजी करण्यास तयार’
अन् द्रविड आणि लक्ष्मणच्या जोडीने २० वर्षांपुर्वी घडवला होता इतिहास!!