इंग्लंड विरुद्ध भारत संघात ५ सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जाणार होती. मात्र, पाचवा सामना सुरु होण्यापूर्वीच भारतीय संघाच्या गोटात कोरोनाचा शिरकाव झाल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे पाचवा सामना रद्द करण्यात आला. या मालिकेचा निकाल प्रलंबित केला असून दोन्ही देशांच्या बोर्डांच्या बैठकीनंतर अंतिम निर्णय घेतला जाईल. दरम्यान, इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनने विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाचे कौतुक केले आहे.
अँडरसनच्या मते, भारताने निर्णायक वेळी इंग्लंडपेक्षा चांगले क्रिकेट खेळले आणि मालिकेत २-१ ने आघाडी घेतली. अँडरसन म्हणाला की, इंग्लड संघाला चांगल्या स्थितीत असताना वर्चस्व राखण्याची कला शिकावी लागेल. भारत आणि इंग्लंड यांच्यातील मालिकेतील पाचवा कसोटी सामना कोरोनामुळे रद्द झाला आहे, कारण भारतीय संघाच्या खेळाडूंनी मँचेस्टर कसोटीच्या पहिल्या दिवशी मैदानात येण्यास नकार दिला. त्यानंतर दोन्ही क्रिकेट मंडळांनी मिळून सामना संपवण्याचा निर्णय घेतला होता.
एका दैनिकासाठी लिहिलेल्या आपल्या लेखात अँडरसन म्हणाला, ‘भारताने मालिकेत २-१ ने आघाडीचे कारण हे आहे की त्यांनी निर्णायक वेळी आमच्यापेक्षा चांगले क्रिकेट खेळले. मला यावर, हा एक खराब किंवा खूप चांगला अनुभव आहे, असे खात्रीशीर मत मांडायचे नाही. जेव्हा आपण सामन्यात पुढे असतो, तेव्हा आपल्याला याचा फायदा पुढे सामना जिंकण्यात कसा करता येईल हे शिकावे लागेल.’
अँडरसनने ओव्हल कसोटीच्या चौथ्या डावात संघाच्या फलंदाजांची कामगिरी लाजिरवाणी असल्याचे म्हटले आहे. तो म्हणाला, ‘उदाहरणार्थ, आम्ही ओव्हलवर ९९ पेक्षा जास्त धावांची आघाडी घेतली. ती एक उत्कृष्ट खेळपट्टी होती. मला वाटते भारतीय संघाने दुसऱ्या डावात चांगली फलंदाजी केली, पण आपण गोलंदाजीत काय चांगले केले? आणि दुसऱ्या डावातील त्या खेळपट्टीवर आम्ही सर्वबाद व्हायला नको होते. जसप्रीत बुमराहचा तो एक अप्रतिम स्पेल होता, जिथे त्याला थोडासा रिव्हर्स स्विंग मिळाला आणि त्याने विकेट्स घेतल्या.’
जेम्स अँडरसनने पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत खेळलेल्या चार सामन्यांत एकूण १५ बळी घेतले. त्याने भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीला दोनदा बाद केले. अँडरसनच्या उत्कृष्ट गोलंदाजीमुळे इंग्लंडने लीड्स कसोटीत भारताचा एक डाव आणि ५६ धावांनी पराभव केला.
गुरुवारी भारतीय संघाचे फिजिओ योगेश परमार कोरोना पॉझिटिव्ह आढळले, त्यानंतर भारतीय संघाच्या शिबिरात खळबळ उडाली. यापूर्वी, ओव्हल कसोटीपूर्वी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री, तसेत गोलंदाजी प्रशिक्षक भारत अरुण आणि क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आर श्रीधर हे कोरोना संक्रमित आढळले होते.
महत्त्वाच्या बातम्या –
आपल्या खेळाडूंना मँचेस्टरवरुन युएईला आणण्याच्या तयारीत चेन्नई सुपर किंग्स, सीईओने दिली माहिती
इकडे आड तिकडे विहीर! रवींद्र जडेजा फसला मोठ्या पेचात, जाणून घ्या काय आहे प्रकरण
अंतिम सामन्यात पराभूत होऊनही बांगलादेशचा मोठा कारनामा; न्यूझीलंडविरुद्ध जिंकली ऐतिहासिक मालिका






