युवा फलंदाज अरमान जाफरचे शतक आणि गोलंदाजांच्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर मुंबईने मंगळवारी (31 ऑगस्ट) दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात ओमानचा 231 धावांनी पराभव केला. मस्कतमध्ये झालेल्या या सामन्यात मुंबईच्या संघाने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकांत 8 गडी गमावत 300 धावा केल्या. प्रत्युत्तरात यजमान संघ केवळ 69 धावांवर सर्वबाद झाला. ओमानचा संघ केवळ 22.5 षटके मैदानावर टिकू शकला. त्यांचे 9 खेळाडू दुहेरी आकडाही गाठू शकले नाहीत.
अरमान जाफरने मुंबईसाठी 114 चेंडूत 122 धावा केल्या. त्याचवेळी सुजित नायकने 70 चेंडूत नाबाद 73 धावा केल्या. गोलंदाजांमध्ये मोहित अवस्थीने 4 आणि धुर्मिल मतकरने 3 बळी घेतले. अरमान जाफर 2016 साली बांगलादेशमध्ये झालेल्या 19 वर्षांखालील विश्वचषकात भारतीय संघाचा सदस्य होता. त्या संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविड होते. अरमान जाफरने एका मुलाखतीत सांगितले होते की, राहुल द्रविडमुळे त्याच्या खेळात शिस्त आणि सकारात्मक दृष्टीकोन आला आहे.
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना मुंबईची सुरुवात खराब झाली आणि लवकरच संघाने यशस्वी जयस्वाल (27) आणि आकर्षित गोमेल (05) यांच्या विकेट गमावल्या. त्यानंतर जाफरने मोर्चा सांभाळला. 22 वर्षीय जाफरने ओमानच्या गोलंदाजांना लक्ष्य करताना त्याच्या डावात 11 चौकार आणि 3 षटकार मारले. त्याने चिन्मय सुतार (37) सोबत तिसऱ्या विकेटसाठी 63 धावा जोडल्या.
ओमानने मात्र त्यानंतर पटापट 2 विकेट घेतल्या, ज्यामुळे मुंबईची अवस्था 5 बाद 151 अशी झाली. त्यानंतर जाफर आणि नायक यांनी सहाव्या विकेटसाठी 122 धावा जोडल्या आणि संघाला मजबूत धावसंख्येपर्यंत नेले. नायकने आपल्या डावात सहा चौकार लगावले.
प्रत्युत्तरादाखल, भारताच्या मोहित अवस्थीने आणि दीपक शेट्टी या जलद गोलंदाजी जोडीने झटपट ओमानची धावसंख्या 4 बाद 24 पर्यंत अशी केली, ज्यातून ओमानचा संघ सावरला नाही. डावखुरा फिरकी गोलंदाज धुर्मिल मातकरनेही 21 धावांत तीन विकेट घेतल्याने ओमान 22.5 षटकांत सर्वबाद झाला. ओमानविरुद्ध टी-20 मालिका जिंकल्यानंतर मुंबईने एकदिवसीय सामन्यांमध्ये चमकदार कामगिरी केली आहे. दुसरा वनडे सामना जिंकत त्यांनी 2-0 ने मालिकेत आघाडी घातली आहे. तिसरा वनडे 3 सप्टेंबर रोजी खेळला जाईल.
महत्त्वाच्या बातम्या-
अरेरे! ‘या’ क्रिकेटरने मित्रासाठी तोडले बायो-बबलचे नियम, मग काय स्पर्धेतून झाली हकालपट्टी
नवी इनिंग! निवृत्तीनंतर स्टुअर्ट बिन्नी प्रशिक्षक बनण्यास इच्छुक, ‘या’ भागातील खेळाडूंना देणार धडे
नादच खुळा! दोन नव्या संघांच्या लिलावातून बीसीसीआयला मिळणार ‘एवढे’ रुपये