ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी20 विश्वचषकात बुधवारी (2 नोव्हेंबर) भारत आणि बांगलादेश यांच्या दरम्यान सुपर 12 फेरीतील सामना खेळला गेला. अखेरच्य चेंडूपर्यंत रंगलेल्या या सामन्यात भारतीय संघाने 5 धावांनी विजय मिळवत उपांत्य फेरीतील आपली जागा जवळपास पक्की केली. भारताच्या या विजयात युवा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग (Arshdeep Singh) याची कामगिरी उल्लेखनीय राहिली. संपूर्ण विश्वचषकात त्याने आपल्या गोलंदाजीने भारतीय संघाचा भार वाहिला आहे.
बांगलादेश विरुद्धच्या सामन्यात भारतीय संघाने 184 धावा धावफलकावर लावल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना पावसाने व्यत्यय आणेपर्यंत बांगलादेशने बिनबाद 66 धावा चोपलेल्या. पुन्हा खेळ सुरू झाला तेव्हा बांगलादेशला विजयासाठी 9 षटकात 85 धावांची गरज होती. पावसाने खेळ सुरू झाल्यानंतर बांगलादेशचे दोन्ही सलामीवीर लवकर बाद झाले. त्यानंतर बांगलादेशची आशा कर्णधार शाकिब हसन व उपकर्णधार अफिफ हुसेन यांच्यावर होती.
बांगलादेशला विजयासाठी 5 षटकात 52 धावांची गरज असताना गोलंदाजीला आलेल्या अर्शदीपने आपल्या पहिल्याच चेंडूवर हुसेन याला बाद केले. त्यानंतर याच षटकातील पाचव्या चेंडूवर त्याने बांगलादेशच्या आशांना सुरुंग लावला. अखेरच्या षटकातही 20 धावांचा बचाव करत त्याने भारताचा विजय साकार केला. विशेष म्हणजे भारतीय कर्णधार रोहित शर्मा याने मोहम्मद शमी व भुवनेश्वर कुमार हे दोन अनुभवी पर्याय अंतिम षटकासाठी उपलब्ध असताना, अर्शदीपकडे चेंडू सोपवला.
केवळ तीन महिन्यांपूर्वी आंतरराष्ट्रीय पदार्पण करणाऱ्या अर्शदीपने या विश्वचषकात भारतीय संघासाठी 9 बळी घेत सर्वोत्तम गोलंदाजी केली आहे. पाकिस्तान विरुद्ध तीन तर नेदरलँड्स, दक्षिण आफ्रिका व बांगलादेश यांच्याविरुद्ध प्रत्येकी दोन बळी घेण्यात त्याला यश आलेय. सुपर 12 फेरीत सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत तो इंग्लंडच्या सॅम करनसह संयुक्तपणे दुसऱ्या स्थानी आहे. भारतीय संघाला त्याच्याकडून बाद फेरीचा सामन्यात देखील अशाच कामगिरीची अपेक्षा असेल.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
पावसाने बदलला गेम! बांगलादेश पुढे 9 षटकात इतके आव्हान
टी20 विश्वचषकाचा सम्राट बनला ‘किंग कोहली’! लाजवाब खेळीत रचला नवा विश्वविक्रम