दुबई। 18 सप्टेंबरला एशिया कप 2018 स्पर्धेत भारताचा हाँग काँग विरुद्ध पहिला सामना पार पडला. या सामन्यात भारताने जरी 26 धावांनी विजय मिळवला असला तरी हाँग काँगने दिलेल्या जबरदस्त लढतीमुळे त्यांचे कौतुक होत आहे.
भारतीय खेळाडूंनीही हाँगकाँगच्या खेळाडूंचे सामन्यानंतर कौतुक केले आहे. त्यांनी सामन्यानंतर हाँग काँगच्या खेळाडूंना त्यांच्या ड्रेसिंग रुममध्ये जाऊन भेट दिली. याचा व्हिडिओ बीसीसीआयने त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर शेअर केला आहे.
या व्हिडिओत दिसते की भारतीय खेळाडूंनी हाँग काँगच्या खेळाडूंबरोबर काही वेळ घालवला आणि त्यांच्याबरोबर चर्चाही केली. तसेच त्यांनी एमएस धोनी, दिनेश कार्तिक, रोहित शर्मा, भुवनेश्वर कुमार, शिखर धवन अशा खेळाडूंनी हाँग काँगच्या खेळाडूंना मार्गदर्शनही केले. त्याचबरोबर दोन्ही देशांच्या खेळाडूंनी एकमेकांबरोबर फोटोही काढले आहेत.
https://twitter.com/BCCI/status/1042350747554242560
या सामन्यात भारताकडून प्रथम फलंदाजी करताना शिखरने(127 धावा) शतक तर रायडूने(60 धावा) अर्धशतक केले होते. तसेच हाँग काँगकडून गोलंदाजीत किंचीत शहाने 39 धावात सर्वाधिक 3 विकेट घेतल्या, तर एहसान खानने भारताचा कर्णधार रोहित आणि धोनीला स्वस्तात बाद करत भारताला मोठा धक्का दिला होता.
तसेच भारताने हाँग काँगला 286 धावांचे विजयासाठी आव्हान दिल्यानंतर हाँग काँगच्या सलामीवीर फलंदाज निजाकत खान आणि कर्णधार अंशुमन राठने भारतीय गोलंदाजांना चांगलेच दमवले होते. त्यांनी भारताला पहिल्या 30 षटकात एकही विकेट मिळू दिली नव्हती.
या दोघांनी अर्धेशतके करताना पहिल्या विकेटसाठी तब्बल 174 धावांची भागीदारी रचली. मात्र या दोघांचेही शतक थोडक्यात हुकले. निजाकतने 115 चेंडूत 92 धावा केल्या. यात त्याने 12 चौकार आणि 1 षटकार मारला. तर अंशुमनने 4 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 97 चेंडूत 73 धावा केल्या.
मात्र हे दोघे बाद झाल्यानंतर हाँग काँगच्या मधल्या फळीने झटपट विकेट गमावल्याने त्यांना 50 षटकात 8 बाद 259 धावाच करता आल्या.
भारताकडून खलील अहमद आणि युजवेंद्र चहलने प्रत्येकी 3 आणि कुलदीप यादवने 2 विकेट्स घेतल्या.
महत्त्वाच्या बातम्या-
–एशिया कप २०१८: शिखर धवनचा विक्रमांचा सिलसिला सुरूच
–एशिया कप २०१८: केवळ 16 तासात टीम इंडिया खेळणार दुसरा आंतरराष्ट्रीय सामना
–एशिया कप २०१८: भुवनेश्वर कुमारने पाकिस्तानला सुरुवातीलाच दिले दोन धक्के