एशिया कप २०२२चे वेळापत्रक जाहीर झाले आहेत. या स्पर्धेवर सगळ्यांचे लक्ष टिकले आहे. या स्पर्धेतील पहिला सामना २७ ऑगस्टला खेळला जाणार आहे. तर चाहत्यांना ज्या सामन्याची प्रतिक्षा आहे, तो भारत विरुद्ध पाकिस्तान सामना २८ ऑगस्टला खेळला जाणार आहे. या सामन्यासाठी पाकिस्तान संघाने त्यांचा संघ जाहीर केला आहे, तर भारतही लवकरच त्यांचा संघ घोषित करणार आहे. भारतीय संघ सध्या वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर आहे. तेथे खेळत असलेल्या पाच टी२० सामन्यांपैकी ३ सामने झाले आहेत. तर ही मालिका संपताच भारत एशिया कपसाठी त्यांचा संघ जाहीर करेल अशी वर्तवण्यात येत आहे.
वेस्ट इंडिजच्या मालिकेत भारताच्या अनेक वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. तसेच या दौऱ्यानंतर भारत झिम्बाब्वेला रवाणा होणार आहे. या दौऱ्यात तीन वनडे सामने खेळले जाणार असून भारतीय संघ शिखर धवन (Shikhar Dhawan) याच्या नेतृत्वाखाली खेळणार आहे. या दौऱ्यातून रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहली (Virat Kohli) यांना विश्रांती दिली आहे. मात्र एशिया कपसाठी भारताचा परिपूर्ण संघ युएईला जाण्याची शक्यता आहे. तर रोहित पुन्हा एकदा कर्णधाराची जबाबदारी सांभाळताना दिसणार आहे. विराट आणि जसप्रीत बुमराह हे पण संघपुनरागमन करू शकतात.
रोहित, केएल राहुल आणि इशान किशन हे सलामीचे पर्याय
एशिया कप २०२२साठी भारताच्या सलामीसाठी रोहित आणि इशान किशन यांना पहिली पंसती असणार आहे. मागील काही मालिकांमध्ये भारताने सलामीसाठी अनेक जोड्यांचे प्रयोग करून पाहिले आहेत. मात्र एशिया कपमध्ये तसा धोका भारत घेणार नाही. या स्पर्धेत डावा-उजवा हे कॉम्बिनेशन संघ मैदानात उतरवेल. संघात केएल राहुल याचाही समावेश केला जाऊ शकतो. तसेच तो खेळेल की नाही, हे त्याचे सिलेक्शन फिटनेसवर अवलंबून राहणार आहे.
मध्यम फळीत विराटसोबत सूर्यकुमार, दीपकचा समावेश
एशिया कपसाठी विराट संघात परतण्याची आशा आहे. तो तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करेल. तसेच मध्यम फळीत सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) आणि दीपक हुड्डा यांचाही संघात सामवेश असण्याची शक्यता आहे. त्यांच्यामुळे भारताची मध्यम फळी आणखी मजबूत होणार आहे.
यष्टीरक्षणाबरोबरच फिनिशर्ससाठीही अनेक पर्याय, गोलंदाजीत बुमराहचे पुनरागमन
भारतीय संघासाठी फिनिशरची वेळ येते तेव्हा रिषभ पंत, रविंद्र जडेजा, दिनेश कार्तिक आणि हार्दिक पंड्या ही नावे पुढे येतात. तसेच गोलंदाजीत बुमराह संघपुनरागमन करू शकतो. त्याच्याबरोबरच वेगवान गोलंदाजीसाठी भुवनेश्वर कुमार हा पण उत्तम पर्याय आहे. तर संघात युझवेंद्र चहल, आवेश खान आणि अर्शदीप सिंग यांचाही समावेश असू शकतो.
वेस्ट इंडिजच्या दौऱ्यात असलेल्या रविचंद्रन अश्विन आणि रवि बिश्नोई या फिरकीपटूंपैकी एकाला एशिया कपमध्ये संधी मिळू शकते. संघनिवड अधिकारी या मालिकेमधूनच टी२० विश्वचषकासाठी काही खेळाडूंना निवडतील. भारतीय संघ पाहिला तर तो एशिया कप जिंकण्याचे सामर्थ्य असणारा परिपूर्ण संघ वाटत आहे.
एशिया कपसाठी भारताचा संभावित संघ-
रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुड्डा, दिनेश कार्तिक, रिषभ पंत, हार्दिक पंड्या, रविंद्र जडेजा, युझवेंद्र चहल, रविचंद्रन अश्विन, रवि बिश्नोई, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, आवेश खान, अर्शदीप सिंग.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
ब्रेकिंग! टी२० विश्वचषकापूर्वी ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेशी दोन हात करणार भारत, वेळापत्रक जाहीर
मुंबई इंडियन्सने पदार्पणाची संधी दिल्यामुळे ९ वर्षांनी घरी गेला ‘हा’ खेळाडू, वाचा कारण
जबरदस्त फॉर्ममध्ये आहे दिनेश कार्तिक; तरीही माजी दिग्गज म्हणतोय, ‘तो फिनिशर नाही’






