गेल्या वर्षाच्या शेवटी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असताना दिग्गज फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने (R Ashwin) अचानक कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा करून सगळ्यांना थक्क केलं होतं. आता अश्विनने या निर्णयामागची खरी कारणं उघड केली आहेत.
कसोटी क्रिकेटमध्ये 106 सामन्यांत 537 विकेट्स घेणाऱ्या अश्विनच्या या निर्णयामुळे त्या वेळी केवळ लाखो कोट्यवधी चाहत्यांनाच नाही तर त्याच्या कुटुंबीयांनाही धक्का बसला होता. त्या वेळी अश्विन मधल्या दौऱ्यातच भारतात परतला होता. काही व्हिडिओ-फोटो पाहून तर असंही वाटलं होतं की त्याचं आणि टीमचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर (Gautam Gambhir) यांचं काहीसं बिनसलं आहे.
पण सध्या घरगुती क्रिकेट आणि आयपीएलमध्ये सक्रिय असलेल्या अश्विनने आता आपल्या त्या अचानक घेतलेल्या निर्णयाबद्दल सविस्तर सांगितलं आहे.
अश्विनने आपल्या युट्युब चॅनलवर सांगितलं,
मला वाटलं की आता वेळ आली आहे की मी आयुष्यात कुठे आहे हे स्वतःला विचारावं. मान्य करायला हवं की मी चांगलाच वयस्कर झालो होतो. त्या दौऱ्यात माजी कोच द्रविड ऑस्ट्रेलियात आले होते. सतत दौऱ्यावर राहणं आणि संघाबाहेर बसणं या सगळ्यामुळे निर्णय घेणं सोपं झालं.
तो पुढे म्हणाला,
असं नाही की मला संघासाठी योगदान द्यायचं नव्हतं, पण मला माझ्या मुलांसोबत घरी जास्त वेळ घालवायचा होता. मुलं मोठी होतायत आणि मी खरंच काय करतोय? हा प्रश्न माझ्या मनात आला. मला वाटलं की माझा निर्णय योग्य आहे. मी नेहमीच ठरवलं होतं की 34-35 व्या वर्षी मी निवृत्ती घेईन. 2014 ते 2019 या काळात भारताच्या कसोटी क्रिकेटमधील वर्चस्वात अश्विनची मोठी भूमिका होती. या काळात त्याने घरच्या मैदानावर जगातील दिग्गज फलंदाजांना अक्षरशः धूळ चारली. तसेच व्हाईट बॉल क्रिकेटमध्येही त्याने चमक दाखवली.






