भारत आणि ऑस्ट्रेलिया संघादरम्यान सुरू असलेल्या बॉर्डर-गावस्कर मालिकेला दुखापतींचे ग्रहण लागलेले आहेत. नुकत्याच पार पडलेल्या सिडनी कसोटी सामन्यात रवींद्र जडेजा, हनुमा विहारी व जसप्रीत बुमराह हे 3 प्रमुख खेळाडू जखमी झाले आहेत. मात्र दौऱ्यातील ही काही पहिलीच वेळ नाही जेव्हा भारतीय संघातील खेळाडू दुखापतग्रस्त झाले, या दौऱ्यात आतापर्यंत तब्बल 13 खेळाडू दुखापतग्रस्त झालेले आहेत. त्यामुही संख्या बघता अजून एक प्लेईंग इलेव्हन देखील तयार होऊ शकते.
ऑस्ट्रेलिया दौऱ्याच्या सुरुवातीलाच आयपीएल मध्ये खेळताना ईशांत शर्मा, भुवनेश्वर कुमार, वरूण चक्रवर्ती व रोहित शर्मा दुखापतग्रस्त झाले होते. या पैकी ईशांत, भुवनेश्वर व वरूण हे संपूर्ण ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून बाहेर झाले, तर रोहित शर्मा केवळ शेवटच्या 2 कसोटी सामन्यांसाठी उपलब्ध झाला आहे.
भारताचे वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी व उमेश यादव हे अनुक्रमे पहिल्या व दुसऱ्या कसोटी सामन्यादरम्यान दुखापतग्रस्त झाले होते. या दोघांचीही दुखापत मोठी असल्याने ते उर्वरित दौऱ्यातून बाहेर झाले आहेत.
तिसरा कसोटी सामना सुरू होण्यापूर्वी के एल राहुलला सरावादरम्यान दुखापत झाल्याने त्याला मालिकेतून बाहेर पडावे लागले. तसेच तिसऱ्या सामन्यादरम्यान रिषभ पंत, रविंद्र जडेजा, हनुमा विहारी ,रविचंद्रन अश्विन व जसप्रीत बुमराह या खेळाडूंना दुखापत झाली आहे. या पैकी विहारी व जडेजा उर्वरित सामन्यातून बाहेर झाले असून बुमराहच्या खेळण्यावर देखील प्रश्नचिन्ह आहेत. याच दरम्यान बातमी समोर येत आहे की मयंक अग्रवाल देखील सरावादरम्यान दुखापतग्रस्त झाला आहे.
नियमित कर्णधार विराट कोहली पहिला कसोटी सामना खेळल्यानंतर पालकत्व रजा घेऊन भारतात परतला होता. विराटची पालकत्व रजा व इतक्या खेळाडूंच्या दुखापतीवर देखील मात करत भारताने 4 सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-1 ने बरोबरी राखत तिसरा सामना अनिर्णित अवस्थेत रोखला होता. मालिकेतील शेवटचा सामना 15 जानेवारी रोजी ब्रिस्बेन येथे सुरू होणार असून कर्णधार अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात खेळणाऱ्या भारतीय संघाकडून सर्व क्रिकेट रसिकांना मालिका विजयाची आशा असणार आहे.
महत्वाच्या बातम्या:
दीपक हुड्डा-कृणाल पंड्या प्रकरणावर इरफान पठाणने मांडले मत, म्हणाला
आएसएल २०२०-२१ : नॉर्थईस्टविरुद्ध भेकेच्या गोलमुळे बेंगळुरूला बरोबरीचा दिलासा