---Advertisement---

रिचा घोषची झुंजार खेळी भारताला विजय मिळवून देण्यात अपयशी, ऑस्ट्रेलियाने टी20 मालिका घातली खिशात

On: शनिवार, डिसेंबर 17, 2022 11:21 PM
Ind-vs-Aus
---Advertisement---

ऑस्ट्रेलिया महिला संघ भारत दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात भारतीय महिला विरुद्ध ऑस्ट्रेलिया महिला संघात 5 सामन्यांची टी20 मालिका खेळली जाणार आहे. यातील चार सामने पार पडले आहेत. या चारही सामन्यांत ऑस्ट्रेलिया संघ भारतावर वरचढ ठरला आहे. शनिवारी (दि. 17 डिसेंबर) ब्रेबॉर्न स्टेडिअम मुंबई येथे मालिकेतील चौथा टी20 सामना पार पडला. हा सामना ऑस्ट्रेलिया संघाने 7 धावांनी आपल्या खिशात घातला. या विजयासह ऑस्ट्रेलियाने मालिकेत 3-1ने आघाडी घेतली आहे.

या सामन्यात भारतीय महिला संघाने नाणेफेक जिंकत गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. हा निर्णय ऑस्ट्रेलिया महिला संघाने चुकीचा ठरवला आणि निर्धारित 20 षटकात 3 विकेट्स गमावत 188 धावांचा डोंगर उभा केला. हा डोंगर पार करताना भारतीय महिलांना चांगलाच संघर्ष करावा लागला. यावेळी भारतीय संघाला 5 विकेट्स गमावत 181 धावाच करता आल्या. त्यामुळे ऑस्ट्रेलियाने हा सामना 7 धावांनी जिंकत मालिकेतील आघाडी वाढवली.

पेरी आणि गार्डनरचा धमाका
ऑस्ट्रेलियाकडून फलंदाजी करताना एलिसा पेरी (Ellyse Perry) हिने सर्वाधिक धावा केल्या. तिने 42 चेंडूत नाबाद 72 धावा चोपल्या. या धावा करताना तिने 4 षटकार आणि 7 चौकारांचीही बरसात केली. तिच्याव्यतिरिक्त ऍशले गार्डनर (Ashleigh Gardner) हिने 27 चेंडूत 3 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 42 धावा केल्या. याव्यतिरिक्त कर्णधार एलिसा हेली हिने 30 आणि ग्रेस हॅरिस हिने नाबाद 27 धावांची आक्रमक खेळी केली.

यावेळी भारतीय संघाकडून गोलंदाजी करताना दीप्ती शर्मा (Deepti Sharma) हिने सर्वाधिक विकेट्स घेतल्या. तिने 4 षटके गोलंदाजी करताना 35 धावा देत 1 विकेट घेतली. तिच्याव्यतिरिक्त राधा यादव (Radha Yadav) हिनेही एका विकेटवर आपले नाव कोरले.

रिचा घोषची खेळी व्यर्थ
ऑस्ट्रेलियाच्या 189 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या भारताकडून कर्णधार हरमनप्रीत कौर (Harmanpreet Kaur) हिने सर्वाधिक धावा चोपल्या. तिने 30 चेंडूत 1 षटकार आणि 6 चौकारांच्या मदतीने 46 धावा केल्या. तिच्याव्यतिरिक्त रिचा घोष (Richa Ghosh) हिनेदेखील नाबाद 40 धावांची शानदार खेळी साकारली. मात्र, तिची ही खेळी व्यर्थ ठरली. या दोघींव्यतिरिक्त देविका वैद्य (32) आणि शेफाली वर्मा (20) यांनाच 20 किंवा त्याहून अधिक धावा करता आल्या. तसेच, स्म्रीती मंधाना 16 आणि दीप्ती शर्माने नाबाद 12 धावांचे योगदान दिले. मात्र, या धावा भारताला विजय मिळवून देण्यात अपयशी ठरल्या.

यावेळी ऑस्ट्रेलियाकडून गोलंदाजी करताना ऍशले गार्डनर आणि अलाना किंग यांनी प्रत्येकी 2 विकेट्स आपल्या खिशात घातल्या. तसेच, डार्सी ब्राऊन हिनेदेखील एक विकेट आपल्या नावावर केली.

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (India vs Australia) संघात मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना 20 डिसेंबर रोजी ब्रेबॉर्न स्टेडिअम, मुंबई येथेच खेळला जाणार आहे. (australia women defeated india women and won t20 series read more)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘आयपीएल त्याच्यासाठी बनली नाहीये, तो…’ दिनेश कार्तिकने कुणाबद्दल केले भाष्य?
बीसीसीआयशी पंगा घेणाऱ्या रमीज राजांचे अध्यक्षपद धोक्यात? ‘हा’ आहे नवीन दावेदार

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---