बांगलादेश टी20 विश्वचषक 2026 मधून बाहेर पडला आहे. शेजारील देश असलेल्या बांगलादेशने भारतात सुरक्षेची चिंता व्यक्त करत या स्पर्धेत खेळण्यास नकार दिला होता. बांगलादेशने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडे (ICC) त्यांचे सामने दुसऱ्या ठिकाणी (व्हेन्यू चेंज) खेळवण्याची विनंतीही केली होती, मात्र त्यांची ही मागणी मान्य करण्यात आली नव्हती. आता मात्र आयसीसीने एक धक्कादायक निर्णय घेत बांगलादेशचा या स्पर्धेत एका वेगळ्या स्वरूपात प्रवेश निश्चित केला आहे.
खरे तर, आयसीसीने शुक्रवारी (30 जानेवारी) सामना अधिकाऱ्यांच्या (Match Officials) यादीची घोषणा केली, ज्यामध्ये 24 पंच (Umpires) आणि 6 रेफरींचा समावेश आहे. विशेष म्हणजे, पंचांच्या या यादीत बांगलादेशी पंचांचा समावेश आहे. आयसीसीच्या या यादीतील शरफुद्दौला इब्ने शाहिद आणि गाझी सोहेल हे बांगलादेशचे पंच आहेत.
याशिवाय पाकिस्तानच्या पंचांनाही या यादीत स्थान देण्यात आले आहे. आयसीसीने सध्या केवळ लीग स्टेजच्या सामन्यांसाठी सामना अधिकाऱ्यांची घोषणा केली आहे. सुपर-8 आणि बाद फेरीच्या (नॉकआउट) सामन्यांसाठीच्या अधिकाऱ्यांची घोषणा नंतर केली जाईल.
सध्या भारत आणि न्यूझीलंड दरम्यान 5 सामन्यांची टी20 मालिका खेळली जात आहे. त्याआधी दोन्ही संघांत तीन सामन्यांची वनडे मालिका झाली होती. भारतीय मैदानावर झालेल्या या तिन्ही सामन्यांत बांगलादेशचे शरफुद्दौला ‘थर्ड अंपायर’ म्हणून दिसले होते. आता टी20 विश्वचषकात भारतीय भूमीवर पुन्हा एकदा बांगलादेशी पंच पाहायला मिळतील.
7 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या विश्वचषकाचा पहिला सामना पाकिस्तान आणि नेदरलँड्स यांच्यात कोलंबोमध्ये खेळला जाणार आहे. या सामन्यात कुमार धरमसेना आणि वेन नाइट्स हे पंच म्हणून जबाबदारी पार पाडतील.






