भारतीय संघाचा अनुभवी यष्टीरक्षक फलंदाज वृद्धिमान साहा (Wriddhiman Saha) सध्या चांगलाच चर्चेचा विषय ठरत आहे. श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत त्याची निवड न झाल्यामुळे त्याने वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यानंतर त्याने एका पत्रकारावर त्याच्यासोबत गैरवर्तन केल्याचाही आरोप केला होता. मात्र, आता त्याच्याबद्दल मोठी बातमी समोर येत आहे. बीसीसीआय (BCCI) म्हणजेच भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने साहाच्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी तीन सदस्यीय समिती स्थापन केली आहे.
ही समिती पुढील आठवड्यापासून कार्यवाही सुरू करेल. तीन सदस्यीय समितीमध्ये बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला, बीसीसीआय कोषाध्यक्ष अरुण सिंग धुमाळ आणि बीसीसीआयच्या सर्वोच्च परिषदेचे सदस्य प्रभतेज सिंग भाटिया यांचा समावेश आहे.
https://twitter.com/ani_digital/status/1497242039892987905
या महिन्याच्या सुरुवातीला केंद्रीय करारबद्ध क्रिकेटपटू असलेल्या साहाने आरोप केला होता की, एका ज्येष्ठ पत्रकाराने मुलाखतीसाठी विचारलेल्या संदेशांना प्रतिसाद न दिल्याने त्याला धमकी देण्यात आली होती.
बीसीसीआयने सांगितले की, या प्रकरणाची दखल घेत सर्वोच्च मंडळाने साहाशी संपर्क साधला आणि या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी तीन सदस्यीय समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला.
बीसीसीआयने विचारले तरी नाही सांगणार पत्रकाराचे नाव
या संपूर्ण प्रकरणानंतर एका वृत्तपत्राशी बोलताना त्याने सांगितले होते की, तो या पत्रकाराच्या नावाचा खुलासा करू इच्छित नाही. तो म्हणाला की, “बीसीसीआयने अजूनपर्यंत माझ्याशी चर्चा केली नाहीय. जर त्यांनी मला नाव सांगायला लावले, तर मी त्यांना सांगेल. माझा उद्देश एखाद्याचे करियर बरबाद करणे किंवा त्याला कमी लेखणे नाहीय. याच कारणास्तव मी ट्वीटमध्ये नाव लिहिले नाही. मला माझ्या आई वडिलांनी असे शिकवले नाहीये. माझ्या ट्वीटचा मुख्य उद्देश फक्त एवढाच होता की, मीडियामध्ये काही असे लोकही आहेत, जे अशा प्रकारची कामे करतात.”






