भारत आणि न्यूझीलंडमध्ये बुधवारी (१७ नोव्हेंबर) टी२० मालिकेतील पहिला सामना खेळला गेला. भारतीय संघाने या सामन्यात पाच विकेट्स राखून विजय मिळवला. भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार पहिल्या सामन्यात फॉर्ममध्ये परतताना दिसला. भुवनेश्वरने या सामन्यात त्याच्या चार षटकांच्या स्पेलमध्ये २४ धावा दिल्या आणि दोन महत्वाच्या विकेट्स घेतल्या. यामध्ये भुवनेश्वरने त्याच्या पहिल्या षटकात न्यूझीलंडच्या सलामीवीराला तंबूत पाठवले.
भारतीय संघाने या सामन्यात नाणेफेक जिंकली आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. न्यूझीलंडच्या डावाचे पहिले षटक टाकण्यासाठी भुवनेश्वर कुमार आला. भुवनेश्वरचा पहिला चेंडू निर्धाव गेला आणि दुसऱ्या चेंडूवर मार्टिन गप्टिलने एक धाव घेतली. त्यानंतर सलामीवीर डॅरील मिशेल फलंदाजीसाठी स्ट्राइकवर आला.
भुवनेश्वरने मिशेलला षटकातील तिसरा चेंडू ऑफ स्टंपच्या थोडी बाहेर गुडलेंथवर टाकला. त्याने टाकलेला हा चेंडू टप्पा पडल्यानंतर वेगात आतमध्ये वळला. अशात डावाचा पहिला चेंडू खेळणाऱ्या मिशेलला काही समजले नाही. हा चेंडू मिशेलच्या बॅट आणि पॅडच्या मधून सरळ मधल्या स्टंपला जाऊन लागला. भुवनेश्वर कुमारने घेतलेल्या या विकेटसाठी त्याचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.
या विकेटसोबतच भुवनेश्वरने त्याच्या टी२० कारकिर्दीतील ५० विकेट्स पूर्ण केल्या आहेत. आंतरराष्ट्रीय टी२० मध्ये भारतासाठी ५० विकेट्स घेणारा तो चौथा गोलंदाज ठरला आहे. तसेच तो पहिला भारतीय ठरला आहे, ज्याने टी२० सामन्यात तीन वेळा पहिल्या षटकात आणि फलंदाजांच्या खेळीच्या पहिल्या चेंडूवर विकेट मिळवली आहे.
भुवनेश्वरच्या नावावर भारतासाठी टी२० क्रिकेटमध्ये पहिल्या ६ षटकात सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम देखील आहे. त्याची ही २६ वी वेळ होती, जेव्हा डॅरील मिशेल पॉवर प्लेमध्ये बाद झाला.
— Cricsphere (@Cricsphere) November 17, 2021
तत्पूर्वी, टी२० विश्वचषकात पाकिस्तानविरुद्ध खेळल्या गेलेल्या भारताच्या पहिल्या सामन्यात भुवनेश्वर कुमारला संधी मिळाली होती, पण त्याला या सामन्यात संघासाठी काही खास योगदान देता आले नाही. त्याने त्याच्या तीन षटकांमध्ये एकही विकेट न घेता २५ धावा दिल्या होत्या. त्यानंतर टी२० विश्वचषकातील पुढच्या चारही सामन्यात त्याला संधी मिळाली नाही.
दरम्यान, न्यूझीलंड आणि भारत यांच्यातीत पहिल्या टी२० सामन्यात न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ६ विकेट्सच्या नुकसानावार १६४ धावा केल्या. प्रत्युत्तरात १९.४ षटकात आणि ५ विकेट्स गमावून भारताने सामना जिंकला. भारताच्या विजयात सूर्यकुमार यादव (६२) आणि कर्णधार रोहित शर्माचे (४८) महत्वाचे योगदान राहिले.
महत्त्वाच्या बातम्या –
टी२० विश्वचषकानंतर आयसीसी क्रमवारीत मोठे फेरबदल; केएल राहुल टॉप फाइव्हमधून बाहेर, तर विराट या स्थानी
रिषभ पंतच्या विजयी चौकाराने वर्ल्डकपच्या पराभवाचा आणि ‘या’ महत्वाच्या रेकॉर्डचाही ‘हिसाब बराबर’
देशावरचं निस्सीम प्रेम! हाताला जखम झाली, रक्त वाहिलं, तरीही सिराजने षटक पूर्ण करत १ विकेटही घेतली