देशांतर्गत क्रिकेटमध्ये सध्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीचे सामने खेळले जात आहेत. या टी20 स्पर्धेत अनेक दिग्गज भारतीय खेळाडू खेळत आहेत. स्पर्धेच्या नुकत्याच झालेल्या सामन्यात भारताचा अनुभवी वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारनं जबरदस्त कामगिरी केली. झारखंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात त्यानं किलर गोलंदाजी करत हॅट्ट्रिक घेतली आहे.
या सामन्यात उत्तर प्रदेशनं प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकात 8 गडी गमावून 160 धावा केल्या होत्या. संघासाठी रिंकू सिंहनं 28 चेंडूत 45 धावांची शानदार खेळी केली. प्रियम गर्गनंही 25 चेंडूत 31 धावा केल्या. प्रत्युत्तरात झारखंडचा संघ 19.5 षटकांत केवळ 150 धावांवरच ऑलआऊट झाला.
झारखंडसाठी स्टार फलंदाज ईशान किशन फ्लॉप ठरला. त्याला केवळ 8 धावाच करता आल्या. उत्तर प्रदेशकडून गोलंदाजी करताना भुवनेश्वर कुमारनं हॅट्ट्रिक विकेट घेतली. त्यानं आपल्या 4 षटकांच्या स्पेलमध्ये एक मेडन ओव्हर टाकला आणि फक्त 6 धावा देत 3 बळी घेतले.
आयपीएल 2025 मध्ये भुवनेश्वर कुमार रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून खेळताना दिसणार आहे. नुकत्याच झालेल्या मेगा लिलावात आरसीबीनं भुवीला 10.75 कोटी रुपयांची बोली लावून आपल्या संघात शामील केलं होतं. सध्याच्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी मधील भुवीचा फार्म पाहता, ही आरसीबी चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे असंच म्हणावं लागेल.
34 वर्षीय भुवनेश्वर कुमारनं 2012 मध्ये भारतासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. त्यानं भारतीय संघासाठी शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना 2022 मध्ये खेळला आहे. भुवीनं टीम इंडियासाठी 21 कसोटी, 121 एकदिवसीय आणि 87 टी20 सामने खेळले आहेत. याशिवाय त्याच्याकडे 176 आयपीएल सामन्यांचा देखील अनुभव आहे.
हेही वाचा –
विनोद कांबळीच्या मदतीला आले वर्ल्ड कप विजेते स्टार, परंतु ही एक अट मान्य करावी लागेल!
टीम इंडियासाठी दुहेरी संकट, खेळपट्टीनंतर आता हवामानाबाबत मोठे अपडेट समोर
अभिषेक शर्माची झंझावती खेळी; अवघ्या 28 चेंडूत ठोकले शतक, या विश्वविक्रमाशी बरोबरी





