जोहान्सबर्ग। काल दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत संघात पहिला टी २० सामना पार पडला. या सामन्यात भारताचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारने २४ धावा देत ५ विकेट्स घेतल्या आणि भारताला विजय मिळवून दिला होता.
ही ५ विकेट्सची घेण्याची कामगिरी करताना भुवनेश्वरने भारतीय गोलंदाजीमध्ये इतिहास रचला आहे. तो क्रिकेटच्या तीनही प्रकारात एका डावात ५ किंवा त्यापेक्षा जास्त विकेट्स घेणारा पहिला भारतीय गोलंदाज ठरला आहे. तसेच एकूण क्रिकेट जगतातील सहावा गोलंदाज ठरला आहे.
याबरोबरच आंतराष्ट्रीय टी२० मध्ये ५ किंवा त्यापेक्षा जास्त विकेट्स घेणारा भुवनेश्वर दुसराच भारतीय गोलंदाज ठरला आहे. याआधी मागील वर्षी १ फेब्रुवारीला इंग्लंडविरुद्ध खेळताना युझवेंद्र चहलने भारताकडून पहिल्यांदा टी २० मध्ये ५ किंवा त्यापेक्षा जास्त विकेट्स घेण्याची कामगिरी केली होती.
चहललाही भुवनेश्वरप्रमाणे क्रिकेटच्या तीनही प्रकारात एका डावात ५ किंवा त्यापेक्षा जास्त विकेट्स घेण्याची संधी आहे, पण अजून त्याला कसोटी क्रिकेटमध्ये भारतीय संघात स्थान मिळालेले नाही. चहलने वनडेमधेही ५ विकेट्स घेण्याची कामगिरी केली आहे.
भुवनेश्वर कुमारने आजपर्यंत २१ कसोटी सामन्यात ६३ विकेट्स, ८६ वनडे सामन्यात ९० विकेट्स आणि २४ आंतराष्ट्रीय टी २० सामन्यात २६ विकेट्स घेतल्या आहेत.
त्याबरोबरच क्रिकेटच्या तीनही प्रकारात शतक करण्याची कामगिरी आजपर्यंत फक्त तीन भारतीय फलंदाजांनी केली आहे. यात सुरेश रैना, रोहित शर्मा आणि केएल राहुल या तिघांनीच भारताकडून क्रिकेटच्या तीनही प्रकारात शतके करण्याचा विक्रम केला आहे.
क्रिकेटच्या तीनही प्रकारात एका डावात ५ किंवा त्यापेक्षा जास्त विकेट्स घेणारे गोलंदाज:
– उमर गुल
-टीम साऊथी
-अजंथा मेंडिस
-लसिथ मलिंगा
-इम्रान ताहीर
-भुवनेश्वर कुमार






