---Advertisement---

टीम इंडियात कमबॅक करण्याबद्दल भुवनेश्वर कुमारने केले मोठे भाष्य, म्हणाला…

On: रविवार, डिसेंबर 29, 2019 5:20 PM
---Advertisement---

भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार सध्या दुखापतीचा सामना करत आहे. त्यामुळे त्याला भारतीय संघातूनही बाहेर रहावे लागत आहे. तो सध्या त्याच्या स्पोर्ट्स हार्नियावर उपचार घेत आहे. पण या दुखापतीनंतर तो क्रिकेटमध्ये कधी पुनरागमन करणार याबद्दल त्यालाही माहिती नसल्याचे त्याने म्हटले आहे.

त्याचबरोबर त्याने बंगळुरुमध्ये असलेल्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीला(एनसीए) त्याच्या रिहॅबिटेशनमध्ये राहिलेल्या कमतरतेबद्दल जबाबदार धरले नाही.

पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत भुवनेश्वर म्हणाला, ‘टी20 विश्वचषकाला अजून 9 महिने बाकी आहेत. मी आत्ता याबद्दल विचार करत नाही. सर्वात आधी मला फिट व्हायचे आहे आणि मला माहित नाही मी कधी फिट होईल.’

एनसीएच्या भूमिकेबद्दल भूवनेश्वर म्हणाला, ‘ते बीसीसीआय कसे घेतात यावर अवलंबून आहे. त्यांनी एनसीएशी बोलले पाहिजे. एनसीएने नक्कीच सर्वोत्तम प्रयत्न केले असावेत, परंतु काय चूक झाली हे माहित नाही. तरीही, मी यावर भाष्य करण्यासाठी योग्य व्यक्ती नाही कारण कदाचित मी काहीतरी वेगळे बोलेल आणि बीसीसीआयचे काही वेगळे निष्कर्ष असतील.’

त्याचबरोबर भुवनेश्वरला जेव्हा विचारले की खेळाडू एनसीएमध्ये जाण्यास घाबरतात का, त्यावर तो म्हणाला, ‘एनसीएमध्ये जायचे आहे की नाही, ही खेळाडूंची वैयक्तिक इच्छा आहे.’

त्याच्या दुखापतीतून बरा होण्याच्या प्रक्रियेवर भुवनेश्वर म्हणाला की, तो डॉक्टरांची अपॉइंटमेंटची वाट पाहत आहे. त्यानंतर शस्त्रक्रियेची आवश्यकता आहे की नाही हे स्पष्टपणे समजेल.

भारताकडून 236 विकेट्स घेणारा भुवनेश्वर म्हणाला, ‘शस्त्रक्रियेबद्दल अद्याप काहीही निश्चित झालेले नाही पण स्पोर्ट्स हर्नियाच्या बाबतीत सामान्यत: शस्त्रक्रिया केली जाते. परंतु असे असूनही आम्हाला डॉक्टरांना भेटावे लागेल. यानंतर काय होईल हे मला माहिती नाही परंतु शक्य तितक्या लवकर यावर उपचार घेण्याचा आमचा प्रयत्न आहे.’

तसेच तो म्हणाला, ‘डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय मी परत कधी येईल हे सांगू शकत नाही कारण ते सर्व उपचारांवर अवलंबून आहे.’

याबरोबरच टी20 विश्वचषकासाठी भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी त्याच्यामध्ये आणि दीपक चाहरमध्ये असलेल्या स्पर्धेबद्दल तो म्हणाला, ‘जेव्हा मी फिट होईल तेव्हा कामगिरीवर हे अवलंबून असेल. त्यामुळे मी याबद्दल विचार करत नाही. निवड करणे माझ्या हातात नाही किंवा ते माझे काम नाही. माझे काम चांगली कामगिरी करणे हे आहे आणि मी ते करीन.’

भुवनेश्वर वेस्ट इंडिज दौऱ्यादरम्यान भारतीय संघातून स्नायूमध्ये ताण आल्याने बाहेर पडला होता. पण त्यानंतर त्याने याच महिन्यात वेस्ट इंडिज विरुद्ध झालेल्या टी20 मालिकेतून पुनरागमन केले होते. मात्र पुन्हा एकदा तो दुखापतग्रस्त झाला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---