टी-20 वर्ल्ड कप 2026 ची सुरुवात 7 फेब्रुवारीपासून होणार आहे. या मेगा आयसीसी इव्हेंटला आता केवळ 30 दिवसांचा कालावधी शिल्लक आहे. अशातच टीम इंडियासाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. टी-20 फॉरमॅटमध्ये सध्या टीम इंडियाचा सर्वात मोठा मॅच विनर मानला जाणारा तिलक वर्मा याला टेस्टिकुलर टॉर्शनचा त्रास झाला आहे. यामुळे त्याला राजकोटमधील रुग्णालयात दाखल करावे लागले, जिथे त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. आता तो मैदानात कधी परतणार, हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
विजय हजारे ट्रॉफी 2025-26 मध्ये तिलक वर्मा हैदराबाद संघाचे नेतृत्व करत आहे. लीग स्टेजच्या शेवटच्या सामन्यापूर्वी तिलकला अचानक वेदना सुरू झाल्या. त्यानंतर त्याला तातडीने राजकोटच्या रुग्णालयात नेण्यात आले, जिथे त्याला टेस्टिकुलर टॉर्शन झाल्याचे निदान झाले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, तिलकची शस्त्रक्रिया यशस्वी झाली असून तो सध्या विश्रांती घेत आहे. डॉक्टरांच्या मते, शस्त्रक्रियेनंतर पूर्णपणे तंदुरुस्त होण्यासाठी त्याला 3 ते 4 आठवडे लागू शकतात. अशा परिस्थितीत त्याचे टी-20 वर्ल्ड कप 2026 मध्ये खेळणे कठीण दिसत आहे.
न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 मालिकेतून तर तिलक पूर्णपणे बाहेर पडला आहे, मात्र बीसीसीआयने (BCCI) अद्याप याबाबत अधिकृत घोषणा केलेली नाही.
टीम इंडियासाठी टी-20 फॉरमॅटमध्ये तिलक वर्मा सध्या एक महत्त्वाचा खेळाडू म्हणून समोर आला आहे. आशिया कप 2025 च्या फायनलमध्ये त्याने खेळलेल्या खेळीमुळेच भारताने पाकिस्तानचा पराभव केला होता. मोठ्या सामन्यांचा खेळाडू असल्यामुळे टीम इंडियाला त्याची उणीव भासू शकते. तिलक तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना परिस्थितीनुसार आपला खेळ बदलण्यात माहीर आहे. तो गरज पडल्यास संयमी फलंदाजी करू शकतो आणि वेळ आल्यास आक्रमक फटकेबाजी करण्यातही पटाईत आहे. तिलक वर्माच्या या दुखापतीमुळे आता शुबमन गिलला संघात पुन्हा संधी मिळण्याची शक्यता आहे.






